रत्नागिरी
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यातील शिक्षक आपल्या पत्नीसह गावाला जाताना बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी मंगळवारी निघाले होते. मात्र, वाटेत ते बेपत्ता झाले आहेत.
अचानक बेपत्ता झाले, 24 तासांपासून संपर्क नाही
आपल्या मूळ गावी निघालेले या कुटुंबातील पती – पत्नी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल, मंगळवारी (26 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजता चिपळूण परिसरात असताना त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद येत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे.
गणेशोत्सवासाठी गुहागरहून गावी जायला निघालं होतं कुटुंब
गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण गुरुजींनी गुहागरहून प्रवास सुरू केला होता. काल सायंकाळी 5 च्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून, अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले असून, त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे.
कुटुंबीय चिंतेत, कोणी त्यांची गाडी किंवा त्यांना पाहिलं असेल तर माहिती देण्याचं आवाहन
चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते, ती गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे कळकळीचे आवाहन चव्हाण यांच्या कुटुंबियांनी केले आहे. या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी भारत देवकांत पाटण (संपर्क: 9850277942) आणि अभिजित गोळे सर (संपर्क: 8975732094) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चव्हाण कुटुंब सुरक्षित असावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. या घटनेची माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा वरील दोन्ही व्यक्तींना संपर्क साधावा.
