अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत मंगळवारी रात्री मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे यांनी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मोरे हे केवळ जिल्हाध्यक्ष नव्हते तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे आक्रमक, आंदोलनशील आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत
मटा ऑनलाइन सोबत बोलताना रवींद्र मोरे म्हणाले, मी गेल्या वीस वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आंदोलन करून सुटत नाहीत. आता थेट सत्ता हवी, निर्णय घेण्याची ताकद हवी म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात अर्थात शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात राहून अधिक आक्रमक पद्धतीने काम करू. राजू शेट्टींनी आम्हाला सर्व काही सहकार्य केलं त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सेनेत प्रवेश करत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.
