• Wed. Jul 1st, 2026

    जरांगेंची मुंबईकडे कूच, पण निघताना पोलिसांकडून हाती 40 अटींचं पत्र; कोणते नियम पाळावे लागणार?

    ByMH LIVE NEWS

    Aug 27, 2025
    जरांगेंची मुंबईकडे कूच, पण निघताना पोलिसांकडून हाती 40 अटींचं पत्र; कोणते नियम पाळावे लागणार?

    जालना-प्रतिनिधी 
     मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. मुंबईतील आझाद मैदान इथं 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगे यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक जालना ते मुंबई या प्रवासासाठी निघाले असल्याने पोलीस प्रशासनही अलर्ट झाले असून जालन्यातील अंतरवाली सराटी इथून निघण्याआधी पोलिसांनी मनोज जरांगे यांना 40 अटींचं पत्र दिलं आहे. जालना ते मुंबई या प्रवासात जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना या अटींचं पालन करावं लागणार आह.जालना पोलिसांकडून जरांगेंना कोणत्या अटी?

    1. अंतरवाली सराटी-मुंबई या प्रवासामध्ये कोणाकडूनही आक्षेपार्ह घोषणा आणि जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

    2. जालना-मुंबई प्रवास हा आधी घोषित केलेल्या मार्गानेच करण्यात यावा. या मार्गात बदल केले जाऊ नयेत.

    3. मोर्चेकऱ्यांसह प्रवास करताना अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने, यामध्ये अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने आदी वाहने आणि रहदारी विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    4. आंदोलकांकडून खासगी व सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याची जबाबदारी आयोजक व आंदोलनकर्ते यांची राहणार आहे.

    5. मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांनी कोणतेही घातक शस्त्र, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड बाळगू नयेत.

    दरम्यान, वरील महत्त्वपूर्ण अटींसह एकूण 40 अटी पोलीस प्रशासनाकडून लादण्यात आल्या आहेत.

    न्यायालयाकडून मनाई, मनोज जरांगेंची भूमिका काय?

    ‘वकील न्यायालयात जातील ते आमचे म्हणणे मांडतील. आमचे मुंबईतील वकील सज्ज आहेत. न्यायदेवता आमचे म्हणणे ऐकून परवानगी देईल. शांततेत आंदोलन हा लोकशाहीचा आणि राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. न्यायदेवता न्याय करील हा आम्हाला विश्वास आहे. आमच्या कायदेशीर मागण्या आहेत. 29 ऑगस्टला मी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे,’ असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे सांगितले.

    ‘इंग्रजांच्या काळात उपोषण झाले, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळात होत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. शिंदे समितीला पहिलीच वाढ दिलेली आहे. त्यांचा काही उपयोग होत नाही. मुदतवाढ देऊन दीड महिना झाला. शिंदे समितीकडून नोंदी शोधल्या जात नाहीत, नुसती मुदतवाढ देतात. तेरा महिने झाले, तरी समिती अभ्यास करीत आहे,’ अशी टीका जरांगे यांनी केली.

    मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी रस्ता देण्यात यावा, अशी मागणी जरांगे यांनी त्यांच्याकडे केली. दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दहा ते बारा हजार लोक अंतरवाली सराटी येथे जमणार आहेत. त्यामुळे जालना पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed