• Wed. Mar 18th, 2026

    भिवंडी शहरात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत कायमस्वरूपी प्रवेशबंदी

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    भिवंडी शहरात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत कायमस्वरूपी प्रवेशबंदी
    भिवंडी 
    भिवंडी शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी आणि वारंवार घडणारे अपघात यामुळे अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून करण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार, शनिवारी तातडीने अधिसूचना काढत वाहतूक शाखेने भिवंडी शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत कायमस्वरूपी प्रवेशबंदी केली आहे.मुंबई-गुजरात आणि नाशिक-गुजरात मार्गावर भिवंडी शहर असल्याने येथून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा चालू असते. भिवंडी शहरात मोठ्या संख्येने यंत्रमाग उद्योग आहेत. या उद्योगाशी पूरक उद्योगही असून शहरामध्ये प्लास्टिकचे मोती बनवण्याचे कारखानेही आहेत. लॉजिस्टिक हब म्हणूनही भिवंडीची ओळख आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १३ लाखांच्या आसपास असून, औद्योगिक शहर असलेल्या भिवंडीमध्ये सुमारे साडेचार लाखांहून जास्त वाहने आहेत. त्यात बाहेरूनही वाहने येत असतात. या पार्श्वभूमीवर शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप येथील नागरिकांना सहन करावा लागतो. व्यावसायिक वाहनांमुळे जीवघेणे अपघातही वारंवार घडले आहेत.
    परिणामी, भिवंडीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी शनिवारी अधिसूचना काढत शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या (सहा चाकी वाहनांवरील) प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. या अधिसूचनेनुसार, गुजरात, वाडा या दिशेने येणाऱ्या आणि नाशिक, मुंबई, अंजूरफाट्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वंजारपट्टी नाका उड्डाणपुलावरून भिवंडी शहरात प्रवेश करण्यास कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वंजारपट्टी पुलावरून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रामार्गे वडपे येथून मुंबई-नाशिक मार्गावरून पर्यायी मार्गाने जातील. वसई, अंजूरफाट्याकडे जाणारी वाहने चाविंद्रा येथून नाशिक-मुंबई मार्गावरून मानकोलीमार्गे इच्छित ठिकाणी जातील.
    कल्याण तसेच मुंबईकडून वाडा, गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रांजनोळी नाका येथे कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने रांजनोळी नाक्याकडून मुंबई-नाशिक मार्गावरून वडपे येथून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रा वंजारपट्टी पुलामार्गे वाडा, गुजरातकडे पर्यायी मार्गाने जातील.

    अंजूरफाटामार्गे वाडा, गुजरात अथवा नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनाही पर्यायी मार्ग देण्यात आला असून, ही वाहने अंजूरफाटा येथून मानकोलीमार्गे मुंबई-नाशिक मार्गाने इच्छित ठिकाणी जातील. वाडा, गुजरातकडे जाणारी वाहने वडपे-चाविंद्रा-वंजारपट्टी उड्डाणपूलमार्गे जातील.

    मंत्री महोदय तुमचं चुकलंच, एक चुकीचा निर्णय लाखोंना मनस्ताप

    तळवली नाक्याकडून भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांनाही कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने तळवली नाक्याकडून खोणी गाव, पारोळ फाटा, वंजारपट्टी उड्डाणपुलावरून चाविंद्रामार्गे नाशिक महामार्गाने इच्छित ठिकाणी जातील. पुढील आदेशापर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अधिसूचनेचा भंग केल्यास वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, अग्निशमन दल, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed