राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं. पण त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यभरात प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत काय-काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य पातळीवर कोणत्याही प्रकारची आघाडी केली जाणार नाही. आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी शहर, तालुका, जिल्हा पातळीवर चर्चा करावी. स्थानिक पातळीवर एकमत होत असेल, तर आघाडी करावी, असे धोरण ठरविले आहे”, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी काँग्रेसच्या मराठवाडास्तरीय पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक सोमवारी झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. कल्याण काळे, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली आढावा बैठक आज झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ता मजबूत करण्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. भारतीय जनता पक्ष लोकशाही विरोधी आहे”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. “लाडकी बहीण योजनेत महायुती सरकारने महिलांची फसवणूक केली आहे, तीन हजार रुपये देवू, असे सांगून दीड हजार रुपये देत आहेत. लाभ देताना बोगस अर्ज मंजूर करण्यात आले. अशा लाभार्थ्यांना वाटप झालेली रक्कम ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी, त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे”, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”