• Mon. Mar 16th, 2026

    मुंबईतील मालाडमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग; अनेकजण अडकल्याची भीती

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    मुंबईतील मालाडमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग; अनेकजण अडकल्याची भीती

    Mumbai Building Fire News: मुंबईतील मालाड पूर्व येथे वैष्णवी हाइट्स इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसंच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

    मोठी बातमी: मुंबईतील मालाडमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई शहरातील मालाड पूर्व इथं आज एका रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. मालाड पूर्वेतील राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी हाइट्स या इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीत काही रहिवासी अडकल्याची भीती असून दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

    मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील वैष्णवी हाइट्स या इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आज दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यानंतर इमारत परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर काही वेळातच 10 ते 12 गाड्यांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसंच दिंडोशी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही काही वेळातच वैष्णवी हाइट्स इथं पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

    Maharashtra Timesमुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, सहा ते सात किमीपर्यंत लांबच-लांब रांगा; 600 हून अधिक पोलीस तैनात

    वैष्णवी हाइट्स ही रहिवासी इमारत असल्याने या इमारतीत अनेक नागरिक वास्तव्यास होते. आग लागलेल्या मजल्यावरील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. तसंच लवकरात लवकर ही आग विझावी जेणेकरून आग इतर मजल्यांवर पसरू नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

    दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने 11 व्या मजल्यावरही काही घरांमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा