Atul Save, Ashok Chavan : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने हसनाळ गावाला पुराचा मोठा फटका बसला. सहा जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पालकमंत्री अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गावाला भेट दिली असता, नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नुकसान भरपाईसाठी एका गावकऱ्याने पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे गावात पोहोचताच नागरिकांनी अभियंताला अटक करण्यात यावी, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय मदत न मिळाल्याने एका ग्रामस्थाने पालकमंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. गावावर अस्मानी संकट आलं असताना पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे लंडन दौऱ्यावर असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळाला.
Nanded Rain Havoc : नांदेडात पाऊस ठरतोय काळ! ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, चहूकडे हाहाकार; ११ जणांचा अंत
१८ ऑगस्टला मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने लेंडी धरण ओव्हरफ्लो झाले. या पुरामुळे हसणाळ, रावणगाव यासह सहा गावांना पाण्याने वेढा घातला होता. हसणाळ येथील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली होती. जनावरे देखील वाहून गेली. घटनेच्या सहाव्या दिवशी पालकमंत्री अतुल सावे हसणाळ, रावणगाव आणि मुक्रमाबाद गावाला भेट दिली. यावेळी एनडीआरफच्या निकषानुसार गावकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.
घरांचं नुकसान झालेल्यांना प्रत्येकी दहा हजाराचा धनादेश देण्यात आला. मात्र आपलं मोठ नुकसान झालं असताना देखील आपल्याला धनादेश दिला गेला नाही, असा आक्षेप घेत चांदोजी रोकडे या गावकऱ्यांने गोंधळ घातला. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील या गावकऱ्याने केला. दरम्यान एनडीआरएफकडून सर्वांनाच मदत दिली जाणार आहे . आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांना धनादेश देण्यात आला, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासनाकडून पूर्णपणे मदत केली जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावनगाव, मुक्रमाबाद येथे नेत्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पूरग्रस्तांना तातडीने जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू, असे पालकमंत्री अतुल सावे म्हणाले. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकर मार्गी लावू. लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्या बाबत गावकऱ्यांचा रोष आहे, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करू, असेही आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

