• Sat. Jun 6th, 2026

    चाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक

    चाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक

    Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासी म्हणून संबोधण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी याबाबतचे परिपत्रक निघण्याचे संकेत आहेत.

    kokanwasi(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे ‘ चाकरमानी ’ असे न म्हणता, ‘ कोकणवासी ’ म्हणून संबोधण्यात यावे, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. वर्षानुवर्षे कोकणवासीयांना चाकरमानी असे संबोधले जात होते. परंतु, अवमानकारक असे संबोधन सरकारी कामकाजातून हटवावे, अशी सूचना पवार यांनी केली. तसेच, यासंदर्भात लवकरात लवकर परिपत्रक काढण्याच्या सूचनाही दिल्या.

    मुंबई-गोवा महामार्गाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत कोकणवासीयांच्या संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि सरकारी कामकाजात त्याऐवजी कोकणवासी हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली होती.
    Maharashtra TimesMaharashtra Weather Update: गणेशोत्सवातही पाऊसमारा? पावसाबाबत हवामान विभागाकडून 2 आठवड्यांचा अंदाज जाहीर
    ‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. परंतु या नागरिकांनी कोकणाशी असलेली कौंटुंबिक नाळ जोडून ठेवली आहे. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्यने आपल्या गावी परतत असतात. गावाकडे त्यांचा उल्लेख ‘चाकरमानी’ असा केला जातो.
    Maharashtra TimesWater Level In Dams: राज्याची पाणीचिंता मिटली! मोठ्या धरणांमध्ये ८८.६५ टक्के पाणी; जलसंपदा विभागाचा अहवाल
    चाकरमानी हा शब्द मराठीतून आला असून, चाकर (सेवक) आणि मानी (मानणारा) यांच्या संयोगातून तयार झाला आहे. मात्र, कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी चाकरमानी या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते, हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकार कडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान देण्यासाठी कोकणवासी हा शब्द वापरण्यात येणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा