• Sat. Mar 7th, 2026
    पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला

    Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये तर एका सहा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. एकुलता एक रिशान गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबियांचा आक्रोश बघून उपस्थितांचे पण डोळे पाणावले आहेत.

    विदर्भात तिघांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा.प्रतिनिधी, गडचिरोली : पोळ्याचा आनंद ओसंडून वाहत असताना आज शुक्रवारी विदर्भाच्या भंडारा , गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील चौघे वाहून गेले. यातील तिघांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी शिवारामध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. किसन भानुदास गायधने (वय ३६) असं मृताचं नाव आहे. किसन २० ऑगस्टला सायंकाळी आपली जनावरे बांधण्यासाठी शेतावर गेले होते. सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शुक्रवारी नाल्यातील पाणी कमी झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला.

    दुसरी घटना भंडारा शहराजवळील खमारी (बुटी) येथे घडली. वैनगंगा नदीत बुडून निलेश रामू मारवाडे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. निलेश हे २० ऑगस्ट रोजी सकाळी घरून निघाले होते. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कारधा पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता वैनगंगा नदीच्या झिरी घाटावर त्यांचा मृतदेह आढळला. कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

    Maharashtra Timesबेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा

    पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी पिढी नदीवर गेलेला युवक पुरात वाहून गेला. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खोळद येथे आज शुक्रवारी सकाळी घडली. शंतनू अविनाश मानकर (वय २५) असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे.

    शवविच्छेदनासाठी खाटेवरून नेला मृतदेह

    पोळ्यासाठी शाळेतून सुटी घेऊन आलेला सहा वर्षीय बालक गावाजवळील नाल्यात वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनासाठी मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचा होता. गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने अडचण निर्माण झाली. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नेण्यात आला. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयर येथे आज समोर आली.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : मोकळ्या प्लॉटवर ढोल ठेवण्यास नकार, कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू; संभाजीनगर हादरलं

    रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६ वर्ष, रा. कोयर, भामरागड) असं मृत बालकाचं नाव आहे. रिशान हा गावापासून १० किमी अंतरावरील लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. पोळ्याचा सण असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणले. रिशान काल गुरुवारी दुपारी गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता. खेळत असताना नाल्यात गेला असता वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेत त्याचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनासाठी भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचे होते. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नारगोंडापर्यंत आणून नंतर भामरागड तालुका मुख्यालयात नेण्यात आले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात अजूनही रस्त्याची सोय नसल्यावरून संताप व्यक्त होत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा