Sadabhau Khot: सोलापूरमध्ये रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जनावरे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरोधात त्यांनी मोर्चा काढला. गायी अडवणाऱ्या लोकांना विरोध केल्यावर धमक्या येत असल्याचं ते म्हणाले.
सांगोला येथे महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चात बोलताना ते म्हणाले की, “माझ्या नादाला लागून अनेक जण भेंडाळले आहेत, तुम्ही पण तसेच व्हाल. काही लोकं गायी अडवतात, याला विरोध केल्यावर मला धमकीचे फोन आले. शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गायी बाजारात विकायला आणलेली नाही. हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही,” असं म्हणत खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.
कल्याण – शीळ रोड असुरक्षित; सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोऱ्या, अपघातांच्या तपासांत अडथळे, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे
गायी अडवणाऱ्या लोकांना विरोध केल्यावर त्यांना धमक्या येऊ लागल्या. यावर ते म्हणाले, “अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला? मी नांगराचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेला, तर तुमच्या *&^#नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा,” असा इशारा खोत यांनी दिला आहे.
गोरक्षकांबद्दल सुरुवातीला काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
गोरक्षकांकडून घेण्यात येणाऱ्या आक्रमक भूमिकेला विरोध करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. “सरकारने आणलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा आता गोपालक हत्या बंदी कायदा झाला आहे. कारण आज शेतकऱ्यांसमोर भाकड गायी, होस्टाईल झालेल्या गायी, कमी दूध देणाऱ्या जर्सी गायी, जर्सी गायींचा गोऱ्हा यांचे काय करायचं, हा मोठा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांकडे दोन जनावरे जर असतील त्यांच्यामध्ये एक जर भाकड निघालं तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही. जर्सी गायीला गोऱ्हा झाला तरी तो औतालाही चालत नाही. त्यामुळे एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहेत आणि त्याच्यावर एकदोन अनुत्पादक जनावर जर भार म्हणून पडलं तर तो धंदा तोट्याचा होत आहे. गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचे म्हटले तर रस्तोरस्ती अडवत आहेत, खंडणी बहाद्दर बनून खंडण्या गोळा करत आहेत. या फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसत आहे. पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर शेतकऱ्यांना 20-25 हजार रुपये मिळायचे. त्याच्यात आणखी 20-25 हजार रुपये घातले तर नवीन जनावर विकत घेता येत होतं. परंतु आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडला आहे. हे गोरक्षक आता गोभक्षक झाले असल्याने आता शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही,” असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला होता.

