• Sat. Jun 6th, 2026
    Maharashtra  Rain Update:  मुंबईला नवा अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, नद्यांना पूर; आज कुठे काय परिस्थिती?

    Maharashtra Weather Update Rain News: मुंबईत पावासाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाची वाटचाल पश्चिम महाराष्ट्राकडे केली आहे. पश्चिम मराहाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गेल्या चार दिवसांत पावसाने मुंबईत एकच धुमाकूळ घातला. गेले चार दिवस मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसला, ज्यामुळे मुंबईकरांचे खूप हाल झाले. रस्त्यांवर पाणी साचलं, रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल बंद पडल्या, घरात पाणी शिरलं, नद्या-नाल्यांना पूर आला, घरातून बाहेर पडणंही कठीण होऊन बसलं. या भीषण परिस्थितीनंतर गुरुवारी (21 ऑगस्ट) मुंबईने चार दिवसांनी मोकळं आकाश पाहिलं.

    मुंबईला पावसाचा येलो अलर्ट, काही भागात अधूनमधून पावसाची शक्यता

    पुढील 48 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, काही निवडक भागात अधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28°C आणि 24°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पण, आता हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे वळला आहे. पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाढच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    Maharashtra TimesMumbai Rains Update: चिंता मिटली! मुंबईकरांना सुखावणारी बातमी, हवामान विभागाकडून पावसाचा नवा अलर्ट

    कोल्हापूर पंचगंगा नदी धोका पातळीवर

    आज कोल्हापूरमध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी, संततधार झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. तर, 79 बंधारेही पाण्याखाली आहे. रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-पन्हाळा आणि कोल्हापूर शिये मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.दुसरीकडे, राधानगरीचे सात पैकी दोन स्वयंचलित दरवाजे सुरु आहेत. त्यामुळे राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झाला आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचा जोर ओसरला असून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या सांडव्यावरून असणाऱ्या विसर्गामध्ये घट झाली आहे. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत थोडी घट होऊ शकते. तर कोल्हापूरसाठी ग्रीन अलर्ट देण्यात आल्यामुळे पावसाची उघडी बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

    पंढरपुरात चंद्रभागा नदीला चौथ्यांदा पूर परिस्थिती

    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी एक लाख 72 हजार क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच, वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज वीर धरणातून नीरा नदीपात्रात 54760 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु आहे.

    उजनी धरणातील आणि वीर धरणातील असा एकत्रित 1 लाख 72 हजार क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये येण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. शंभर कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

    रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला

    गेल्या आठवड्यावर धुळवड घातलेल्या पावसाने कोकणातही बुधवारपासून आता विश्रांती घेतली आहे जवळपास आठ ते दहा दिवसानंतर कोकणात गुरुवारी सूर्यदर्शन झालं आहे. हवामान विभागाकडूनही पावसाचा जोर ओसरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जोपास आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान केल आहे. खेड येथील जगबुडी नदी जवळपास तीन ते चार दिवस धोक्याच्या पातळीवरून वाहत होती तर यंदा 2021 नंतर प्रथमच चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडून शहरात प्रवेश केल्याने पाणी भरलं होत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा