• Sat. Mar 7th, 2026
    फडणवीसांसोबत वर्षा भेटीत काय काय झालं? राज ठाकरेंनी AtoZ सांगितलं, आपण कबुतरं-हत्तीत अडकलोय पण…

    Raj Thackeray PC : देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कुठल्या विषयांवर चर्चा झाली असेल, यावर कुजबूज सुरु असतानाच राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी परत येत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले.

    राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला येथे जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आले होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही त्यांच्यासोबत होते. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा रंगली. या भेटीत कुठल्या विषयांवर चर्चा झाली असेल, यावर कुजबूज सुरु असतानाच राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी परत येत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले. वाहतूक कोंडी या विषयावर चर्चा केल्याचं राज म्हणाले.

    राज ठाकरे काय म्हणाले?

    राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, की “गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयांवर बोलत आहे. त्याचा आराखडा कसा करता येईल, हे पाहतोय. 2014 मध्ये अॅस्थेटिक्स विषयावर 16 मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. टाऊन प्लॅनिंग हा माझा आवडीचा विषय आहे. स्कॉटिश साहित्यिकाचं छान वाक्य आहे, तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मला ते बदलावंसं वाटतं. तुमच्याकडील ट्राफिकची परिस्थिती दाखवा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा शहरांमध्ये रिडेव्हलपमेंटची कामं सुरु आहेत” असं राज ठाकरे सांगत होते.

    माणसं वाढत आहेत, ट्राफिक वाढला आहे, 400 इंच पावसात मुंबईत जो गोंधळ पाहिला, रस्ते कमी आहेत, ट्राफिकला शिस्त नाही, आपण कबुतर हत्तीवर अडकलोय, मूलभूत समस्यांकडे लक्ष नाही, पार्किंग लॉट उभे करायला हवेत, या समस्यांवर तोडगा काढला नाही, तर कठीण आहे. याचा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं राज ठाकरे म्हणाले. रोज या शहरावर माणसं येऊन आदळत आहेत, रस्ते नाहीत, नुसत्या उंचच उंच इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते बांधणं हा धंदा झालाय, वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणावी, नको तिथे भीती घालतात, अर्बन नक्षलवादापेक्षा याकडे लक्ष द्या, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं.

    बेस्ट पतपेढी निवडणुकीत झटका

    दरम्यान, नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर यश मिळालं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात असलेल्या या निवडणुकीत सुपडा साफ झाल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या साथीने मुंबईसह आगामी इतर महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली होती, परंतु अशातच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चांना तोंड फुटलं होतं.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात; भाजपने डिवचलं, पोस्टरवर फक्त उद्धवजींचा फोटो, पण जागा राज ठाकरेंच्या ‘जवळची’
    याआधीही हिंदीसक्तीविरोधातील मोर्चाच्या तोंडावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्यामुळे खळबळ उडाली होती. आताही मुंबईतील काही प्रश्नांवर राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेल्याचं बोललं जात असलं, तरी आदल्याच दिवशी झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवाची किनार असल्यामुळे या ‘टायमिंग’ची चर्चा होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा