• Sat. Mar 7th, 2026
    ठाण्यात धुवाधार! गणेशोत्सवाच्या तोंडावर कारखान्यांत पाणीच पाणी, मूर्तींचे प्रचंड नुकसान

    Thane Rain Update : गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाण्यात धुवाधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सखल भागातील गणपती कारखाने आणि मूर्ती विक्री केंद्रांमध्ये पाणी शिरले, परिणामी मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजारात ग्राहक फिरकेनासे झाले आहेत, ज्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सजावट आणि देखाव्याचे काम करणेही कठीण झाले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : अवघ्या एक आठवड्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना धुवाँधार पावसामुळे ठाण्यात सखल भागातील गणपती कारखाने व गणेश मूर्ती विक्री केंद्रात पाणी शिरले. त्यामुळे मूर्तिकरांना मोठा फटका बसला लाखोंचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे उत्सवाच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने मुख्य बाजारपेठांकडे खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सजावटीसह देखाव्यावर अखेरचा हात फिरवण्याची वेळ आलेली असताना पावसाने उसंत न घेतल्याने पदाधिकारीही त्रस्त झाले आहेत.

    ठाण्यात गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून गणेश मूर्ती विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ठाणे महापालिका, वाहतूक शाखेकडून रीतसर परवानगी काढून लहानमोठे विक्रेते गणेश मुर्त्यांची विक्री करतात. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका या विक्रेत्यांना बसला. लोढा गृहसंकुलानजीक असलेल्या शिळकर आर्टस् येथील मंडपात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे या मंडपातील मुर्त्यांसह या भागातील अनेक मूर्ती विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच माजिवडा येथील गणेश कलानिकेतन या गणपती कारखान्यातही पाणी शिरले. यावेळी पावसाच्या पाण्यापासून मुर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्टँन्डवर ठेवण्यात आले असून लहानसहान विक्रेत्यांसाठी हे नुकसान मोठे आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मूर्ती विक्रेत्यांनी केली आहे.
    Maharashtra TimesThane Rain : पावसामुळे ठाण्याची दाणादाण; ठाणे, दिवा, मुंब्रामधील घरांमध्ये पाणी, कल्याण-भिवंडीत २०४ नागरिकांचे स्थलांतर

    देखावा साहित्याची कमतरता

    गणेशोत्सव देखावा, सजावट, विद्युत रोषणाईचे साहित्य अशा बाबींना पावसाचा मोठा फटका बसला. बाजारातील शेवटच्या क्षणी हे साहित्य मिळताना अडचणी येतात. तर काल्पनिक देखावे आणि इतर प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून केली जाणारी सजावटी अशा वातावरणात सुकण्यासाठी तसेच त्याच्यावर रंगकाम करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते, असेही ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.दरम्यान, ठाण्यात धुवाधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. मंगळवारच्या संततधारेमुळे ठाण्यातील नौपाडा भागातील चिखलवाडी, भाजेवाडी, मुंब्रा आणि दिव्यातील अनेक घरांत पाणी शिरले. तर रस्तेही जलमय झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तसेच ठाण्यापुढील लोकल बंद असल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा