वडिलांनी कामाबद्दल बोलल्याने त्यांचा जीव घेतल्याची घटना समोर येत आहे. या घटनेनंतर वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीत फेकला होता. अखेर आठवड्यानंतर हे प्रकरण सूनेमुळे उघडकीस आले.
या घटनेतील मृत वडिलांचे नाव रामराव उत्तम तेल्हारकर असून त्यांचे वय ६९ आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर वय ४० यास पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत रामराव हे आरोपी मुलगा शिवाजी, सून आणि नातवासोबत संग्रामपूरातील बोडखा येथे राहत होते. १३ ऑगस्ट रोजी मुलगा घरी जेवणासाठी आला होता. याच सुमारास रामराव यांनी शिवाजीला ‘तू घराकडे लक्ष देत नाही. कामधंदा करीत नाही. ताटात उष्टे अन्न का ठेवले’ यावरून विचारणा केली. यावर शिवाजी प्रचंड चिडला आणि रागाच्या भरात त्याने वडील रामराव यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली. यासाठी त्याने त्याने सतरा वर्षीय मुलाची मदत घेतली. मृतदेह एका पोतडीत भरून पूर्णा नदीपात्रात फेकून दिला होता.
सुनेच्या फिर्यादीवरून पती-मुलाविरुद्ध गुन्हा
सुनेने १९ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद तामगाव पोलिसांत दिली. पोलिसांनी मुलगा व नातवाविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१), २३८ (अ), २३८ (ब), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले. तसेच आरोपी शिवाजी याला तत्काळ अटक केली. संग्रामपूर येथील न्यायालसमोर हजर केले असता आरोपीस सहा दिवसांचा पीसीआर देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र पवार करीत आहेत.

