• Sat. Mar 7th, 2026

    कामधंदा करीत नाही, ताटात..; वडील बोलले, मुलानं पित्याला संपवलं, सुनेमुळं प्रकरण उघडकीस, आरोपीस अटक

    कामधंदा करीत नाही, ताटात..; वडील बोलले, मुलानं पित्याला संपवलं, सुनेमुळं प्रकरण उघडकीस, आरोपीस अटक

    वडिलांनी कामाबद्दल बोलल्याने त्यांचा जीव घेतल्याची घटना समोर येत आहे. या घटनेनंतर वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीत फेकला होता. अखेर आठवड्यानंतर हे प्रकरण सूनेमुळे उघडकीस आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    भाग्यश्री लहाने, बुलढाणा : काहीच कामधंदा करीत नाही, ताटात उष्टे अन्न ठेवले असे बोलल्याच्या रागातून संतापलेल्या मुलाने वृद्ध वडिलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह पोतडीत घालून पूर्णा नदीत फेकून दिला. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे ही संतापजनक घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सूनेच्या फियार्दीमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. आठवड्याभरानंतर या घटनेबद्दल सुनेनं फिर्याद दिली.

    या घटनेतील मृत वडिलांचे नाव रामराव उत्तम तेल्हारकर असून त्यांचे वय ६९ आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर वय ४० यास पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत रामराव हे आरोपी मुलगा शिवाजी, सून आणि नातवासोबत संग्रामपूरातील बोडखा येथे राहत होते. १३ ऑगस्ट रोजी मुलगा घरी जेवणासाठी आला होता. याच सुमारास रामराव यांनी शिवाजीला ‘तू घराकडे लक्ष देत नाही. कामधंदा करीत नाही. ताटात उष्टे अन्न का ठेवले’ यावरून विचारणा केली. यावर शिवाजी प्रचंड चिडला आणि रागाच्या भरात त्याने वडील रामराव यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली. यासाठी त्याने त्याने सतरा वर्षीय मुलाची मदत घेतली. मृतदेह एका पोतडीत भरून पूर्णा नदीपात्रात फेकून दिला होता.

    सुनेच्या फिर्यादीवरून पती-मुलाविरुद्ध गुन्हा
    सुनेने १९ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद तामगाव पोलिसांत दिली. पोलिसांनी मुलगा व नातवाविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१), २३८ (अ), २३८ (ब), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले. तसेच आरोपी शिवाजी याला तत्काळ अटक केली. संग्रामपूर येथील न्यायालसमोर हजर केले असता आरोपीस सहा दिवसांचा पीसीआर देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र पवार करीत आहेत.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा