Mumbai Rain Mithi River Alert: मुंबईत सध्या अत्यंत मुसळधार पाऊस पडतो आहे. सततच्या पावसामुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. मिठी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांचं स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे.
मंगळवारी सकाळी मिठी नदीच्या पाणी पातळीने 3.20 मीटर ओलांडताच, कपाडिया नगरमधील जवळच्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुराचा धोका असल्याने, स्थानिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला, तर काहींनी उंच मजल्यांवर स्थलांतर केले आहे.
एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दलाला तात्काळ तैनात करण्यात आले. सध्या नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत हलवत आहोत, असंही ते म्हणाले. हिर्लेकर घटनास्थळी स्वतःहून स्थलांतर प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी आणि आपत्कालीन पथकांशी समन्वय साधण्यासाठी उपस्थित होते.
Mumbai Rain Update: मुंबईत पुढील चार तास धो-धो, रेड अलर्ट जारी, लोकल ट्रेन उशिराने, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन
जवळपास 200 ते 300 झोपडपट्ट्या बाधित भागात आहेत, त्यामुळे तातडीने खबरदारीची कारवाई करणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. अधिकारी अलर्टवर आहेत, पाण्याच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि गरज पडल्यास अधिक स्थलांतर करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू असताना नागरी कर्मचाऱ्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा दिल्या जात आहेत. रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत 300 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Mumbai Local Train Service Update : मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मिठी नदी परिसराची पाहणी केली. तसेच, अधिकाऱ्यांना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याच्या सूचना केल्या आहेत. नदीच्या धोक्याची पातळी कमी झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा
