• Tue. Jun 16th, 2026

    Rain News: पावसाचा कहर; नांदेडमध्ये आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव, 260 घरांची पडझड, 200 हून अधिक जनावरे दगावली

    Rain News: पावसाचा कहर; नांदेडमध्ये आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव, 260 घरांची पडझड, 200 हून अधिक जनावरे दगावली

    Nanded Rain Updates: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 970 गावे बाधित झाली असून 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

    नांदेड: मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गोदावरी, आसना, पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक गावातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. 14 ते 18 ऑगस्टपर्यंत या पाच दिवसात जिल्ह्यातील 970 गावं अस्मानी संकटाने बाधित झाली आहेत. शिवाय जिल्ह्यातील 3 लाख 24 हजार 234 शेतकऱ्यांचे दोन लाख 59 हजार 789 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात सोयाबीन, मूग, उडीद, हळद यासह अन्य पिकांचा समावेश आहे.

    पावसाचा कहर सुरू असताना आतापर्यंत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत अंगावर पडल्याने शेख हसीना बेगम शेख नसेर आणि शेख नसेर शेख अमिन यांचा मृत्यू झाला. तसेच किनवट तालुक्यातील बोधडीमध्ये नाल्याच्या पुरात शाळेची बस वाहून गेल्याने चालक प्रेमसिंग पवार यांचा मृत्यू झाला आहे. तर मुखेड तालुक्यातील हसणाळ येथील भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले यांचा पुराच्या पाण्यात अडकून मृत्यू झाला आहे.

    पश्चिम विदर्भात संततधार! अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीमला फटका; पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू

    पुरामुळे 200 हून अधिक लहान मोठी जनावरे दगावली आहेत. कच्ची व पक्की अशा एकूण 260 घरांची पडझड झाली आहे, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील लोहा, उमरी, किनवट, माहूर, मुखेड, देगलूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यांमध्ये नुकसान अधिक आहे. जिरायत 258532 हेक्टर, बागायत 1072 हेक्टर आणि 186 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झालं आहे. नदी काठच्या जमीन खरडून गेल्या आहेत. पिके पाण्याखाली गेली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

    मुखेडमधील बेपत्ता लोकांचा शोध सुरूच

    जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. शिवाय लेंडी नदीला पूर आल्याने भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव या गावांना पाण्याने वेढा घातला. या पुरात हसनाळ येथील पाच जण बेपत्ता झाले होते, त्यापैकी भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले या महिलांचा मृतदेह आढळला आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. आणखी काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथून सैन्य दलाची तुकडी पाचारण करण्यात आली आहे. आज या दलाकडून शोध मोहीम राबवली जात आहे. सध्या पूर हळूहळू ओसरत आहे. मात्र या अस्मानी संकटामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

    मुक्रमाबाद येथील एकाच शेतकऱ्याची साठ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली- सोमवारी पहाटे मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक गावात पाणी शिरले. तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक बालाजी शंकरअप्पा खंकरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी धरणाचे पाणी शिरुन 40 जनावरांचा बुडून मृत्यू झाला, तर 20 जनावरे वाहून गेली. अवघ्या दहा मिनिटात होत्याचं नव्हतं झालं आहे. यात शेतकऱ्यांचे जवळपास दीड कोटीचे नुकसान झाले आहे.

    बालाजी शंकरअप्पा खंकरे यांनी दहा वर्षा पूर्वी दुग्ध व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला दोन म्हशी खरेदी करून बालाजी यांनी मुक्रमाबाद येथे शेशिकला डेअरी फार्म सुरू केले. त्यानंतर त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात राज्यातून जनावरे खरेदी केले. सध्या त्यांच्याकडे 40 म्हशी, 15 गिरगाय आणि इतर 15 जनावरे होती. या डेअरीच्या माध्यमातून महिन्याकाठी 2 लाख रुपये उत्पन्न होतं. पण काल अस्मानी संकटामुळे अवघ्या दहा मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

    पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नका

    गोदावरी, आसना, पैनगंगा या नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. शिवाय अनेक गावातील नद्या-नाल्यांना मोठा पूर आला आहे. तसेच शेजारील जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणी वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. तरी, पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी अतिउत्साहात पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed