• Sun. Mar 15th, 2026
    तुफान पावसाचा मारा! मुंबई-गोवा महामार्गाला फटका, माणगावजवळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

    Mumbai-Goa Highway : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ पाणी साचल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे. ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रायगड : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्याचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसला आहे. माणगाव येथे पुलाजवळ पाणी आल्याने या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

    रायगड-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री उशिरा थांबवण्यात आली आहे. माणगाव जवळील कलमजे पुलालगत पाणी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पर्यायी सुधागड पाली मार्गे निजामपूर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनास्थळी माणगाव तालुका प्रशासन पोलीस प्रशासन दाखल झाला आह. तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
    Maharashtra TimesBeed News: चार जणांसह गाडी पाण्यात अडकली, तिघांना वाचवण्यात यश पण विशाल नियतीपुढे हरला, बीडमध्ये हळहळ
    रायगड जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने बॅटिंग केली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, सावित्री, आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड तालुक्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बिरवाडी परिसरात पूर्व सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व महाड तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.

    दरम्यान आज दुपारी चार वाजता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे कंटेनरवाहू ट्रक कलंडल्याने सायंकाळी महामार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. रायगड जिल्हयात पोलादपूर चोळई गावाजवळ दुभाजकावर अपघात झाला. कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडून कुंभार्ली घाट सोनपत्रजवळ दरड कोसळली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांनाही मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात निजामपूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने माणगाव-पुणे वाहतूक देखील काही काळ बंद होती.

    सोमवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहरालगत असलेल्या चोळई गावाजवळ चिपळूण बाजूकडून मुंबई दिशेने जाणारा कंटेनरवाहू 12 चाकी ट्रक दुभाजकावर कलंडल्याने अपघात झाला. परिणामी भर पावसात वाहतुकीचा खोळंबा होऊन कशेडी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

    कशेडी घाटातील चोळई गावाच्या तीव्र वळण उतारावरून अतिवेगाने 12 चाकी कंटेनरवाहू ट्रक चालवत उतरताना चालक सद्दाम महंमद माकोडा (रा. गुजरात) याचा ट्रक (क्रमांक जीजे 10 टीव्ही 6550) वरील ताबा सुटल्याने महामार्गावरील रोडडिव्हायडरवरील लोखंडी बॅरिकेटस तोडून पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कंटेनरमधील सामान आणि कंटेनरचे अवशेष बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूने एकेरी वाहतूक सुरू करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा