• Sun. Mar 8th, 2026
    रिक्षाचालकाचा कहर! टल्ली होऊन रिक्षा दामटवली, अनेक वाहनांना धडक; महिला कॉन्स्टेबलने थांबवताच फरफटत नेलं

    Satara News : सातार्‍यात एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भरधाव वेगाचा कहर केला. त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. एवढेच नाही तर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : साताऱ्यातील खंडोबाचा माळ ते मार्केट यार्ड दरम्यान मद्यधुंद रिक्षाचालकाने बेदरकारपणे रिक्षा चालवत सहा दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलला खेचून शंभर मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाचा पाठलाग करून रिक्षा अडवली आणि चालकाला बेदम चोप दिला.

    मार्केट यार्ड रस्त्यावर थरार अन् धावाधाव

    मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालक खंडोबाचा माळ येथून मार्केट यार्ड रस्त्याने बेदरकार रिक्षा चालवत येत होता. यादरम्यान त्याने अनेक दुचाकी तसेच चार चाकी वाहनांना धडक दिली. शहर वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलने त्याला अडविण्याचा प्रयत्न करताच चालकाने त्यांच्या हाताला पकडून रिक्षा वेगाने चालवली. त्यांना रस्त्यावरून शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यावेळी मार्केट यार्ड रस्त्यावर भरधाव रिक्षाचा थरार आणि नागरिकांची धावाधाव पाहायला मिळाली.
    Maharashtra TimesHingoli News : पारोळा धबधबा ओव्हरफ्लो, पाहण्यास पर्यटकांची मांदियाळी पण अघटीत घडलं; तरुणाचा दुर्दैवी अंत

    महिला कॉन्स्टेबल गंभीररित्या जखमी

    रिक्षा चालकाने फरफटत नेल्यामुळे महिला कॉन्स्टेबल रक्तबंबाळ होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. रिक्षाचालक महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी अनेक नागरिक रिक्षाच्या मागे धावत होते. अखेर नागरिकांनी रिक्षा अडवली. मद्यपी चालकाला बेदम चोप दिला. जखमी महिला कॉन्स्टेबलला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पोलीस आल्यानंतर रिक्षा चालकाला त्यांनी ताब्यात घेतलं. रात्री त्याला अटक करण्यात आली.

    रिक्षा चालकांची मुजोरी चव्हाट्यावर

    साताऱ्यात वाहतुकीची शिस्त बिघडलेली असतानाच आता त्यात रिक्षा चालकांच्या मुजोरीची भर पडली आहे. रिक्षाचालक कधीही वाहतुकीचे नियम पाळत नाहीतच शिवाय प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे घेतात. प्रवाशांना उर्मटपणे बोलतात. दारूच्या नशेत वाहन चालविणे, महिलांना टोमणे मारणे, अशा घटना घडत असल्याच्या तक्रारीही आता नागरीक करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा