Central Railway: धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांत फलाट विस्ताराचे रेल्वेचे नियोजन आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २१० फेऱ्या धावतात. सीएसएमटी-कल्याण लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबते. उर्वरीत रेल्वे स्थानकांत फलाटांची लांबी पुरेशी नसल्यामुळे लोकलचा थांबा देण्यात आलेला नाही. सीएसएमटीतील केवळ फलाट क्रमांक सातची लांबी १५ डबा लोकल फेऱ्या चालवण्यासाठी परिपूर्ण आहे. यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लोकल गाडी उभी करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत फेऱ्या पूर्ण झाल्यावर सीएसएमटी आणि कल्याण यार्ड अशा दोनच ठिकाणी लोकल गाडी उभी करण्याचा पर्याय आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलद मार्गासह धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. धीम्या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दोन टप्प्यांत १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार प्रस्तावित आहे. पहिल्या टप्यात कर्जत मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांतील फलाटांचा समावेश आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागेची मोठी अडचणी आहे. यामुळे सीएसएमटी ते ठाणे जलद आणि ठाण्याच्या पुढे धीमी अशा अर्धजलद लोकलचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकूर्ली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही १५ डबा लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान केवळ डोंबिवली स्थानकातच १५ डबा लोकल थांबण्यासाठी परिपूर्ण फलाट आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंब्रा अपघाताचे गूढ कायम
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जूनला सकाळी ९ वाजून ०१ मिनिटांच्या सुमारास कसारा-सीएसएमटी जलद आणि सीएसएमटी-कर्जत जलद लोकलमधील एकूण १३ प्रवासी जखमी झाले. यातील काही रुळांवर तर काही डब्यात पडले. यात ५ प्रवाशांचा मृत्यू आणि आठ प्रवासी जखमी झाले. मात्र, अपघात नेमका कसा घडला याचा अंतिम अहवाल मध्य रेल्वेने अद्याप जाहीर झालेला नाही.
सुट्टीच्या वेळापत्रकाने प्रवाशांचे हाल
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त सकाळी झेंडावंदन करून दुपारनंतर मुंबई पर्यटन, देवदर्शन आणि खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मध्य रेल्वेच्या सुट्टीच्या वेळपत्रकाचा त्रास शुक्रवारी सहन करावा लागला. मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांत मोठी गर्दी उसळल्याने प्रवाशांचे हाल झाले.

