Ajit Pawar On Meat Sale Ban : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. अशातच आणखी चार महापालिकांनी देखील असाच निर्णय घेतला आहे. या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्षेप घेतला आहे. स्वातंत्र्य दिनी मांसविक्री बंदी योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मासविक्री बंदीच्या तप्त मुद्द्यावर अजित पवारांना विचारले असता. ते म्हणाले, ज्यावेळी श्रद्धेचा प्रश्न असतो, त्यावेळी ही बंदी घातली जाते. आषाढी, महाशिवरात्री आणि महावीर जयंती अशा महत्वाच्या सणांना बंदीचे आदेश निघतात. पण आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली. आपल्या देशामध्ये बहुतेक जण शाकाहारी आहेत. कोकणात साध्या भाजीतही सुकट टाकतात, हा त्यांचा आहारच आहे. त्यांचा आहार घेण्यास बंदी घालणं योग्य नाही. महत्वाच्या शहरांत अनेक जातीधर्माची लोक राहतात. भावनिक मुद्दा असेल आणि बंदी घातली तर लोकांना ते स्वीकारार्ह असतं पण महाराष्ट्र दिनाला, स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी बंदी घातली तर अवघड ठरणार आहे.
Meat Sale Ban : मोठी बातमी! कल्याणनंतर मालेगाव, संभाजीनगरमध्येही मांसविक्री बंदीचा आदेश; स्वातंत्र्यदिनी कुलूप
अजित पवारांनी पुढे असेही नमूद केले की, लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. भावनेचा आणि श्रद्धेचा जेव्हा विषय येईल तेव्हा त्याचा त्या त्या अँगलने विचार करावा, अशी बंदी घालणं मात्र उचित नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले.
अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांस विक्रीवरील बंदी उठवायची की तशीच ठेवायची असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांचे विधान पेच वाढवणारे?
महापालिकांच्या आयुक्तांनी राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसारच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मासविक्री बंदी अयोग्य असल्याचे विसंगत विधान केल्याने निर्णय प्रक्रियेत संभ्रम तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मांस विक्रीवरील बंदी उठवायची की नाही? असा सुद्धा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहिला आहे.

