Solapur Farmer Ends Life : सोलापूरातून २८ वर्षीय शेतकऱ्याने थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवले आहे. त्यांनी विष प्राशन केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल.
अक्कलकोट तालुक्यातील नागुर येथील सुनील चिवडाप्पा कुंभार (वय 28) या तरुण शेतकऱ्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर यांच्याकडील थकीत ऊस बिल आणि मैंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
चिठ्ठी लिहिली अन् आयुष्य संपविले
सुनील कुंभार हे एकलुते एक असल्याने घरची जबाबदारी सुनीलवरच होती.कर्जबाजारी पणाला कंटाळून सुनील या युवा शेतकऱ्याने अखेरची चिट्टी लिहिली.उसाचे बिल थकीत आहे,वेळेवर कारखान्याने उसाचे बिल दिले नाही.बँकेचा हफ्ता आलाय आणि ट्रॅक्टरचा कर्ज कसे फेडू असे मजकूर लिहून विषारी द्रव्य प्राशन केले.
तीनचार दिवसांपासून मृत्यूशी झुंज
सुनील कुंभार या युवा शेतकऱ्याने तीन-चार दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्रास होऊ लागल्यावर सुनील यास सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन चार दिवस सुनीलने मृत्यूशी झुंज दिली अखेर सोमवारी त्याने अखेरचा श्वास घेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयातच हंबरडा फोडला. सुनीलचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय येथे पाठविले आहे. सुनील कुंभार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
घरातील कर्ता पुरूषच गेला
घरातील कर्ता युवकच गेल्याने कुंभार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील हे आई-वडिलांना एकुलते चिरंजीव होते. आई मानसिक आजाराने त्रस्त आहे, तर वडिलांना वयोमानाने काम जमत नाही. त्यामुळे घरची जबाबदारी सुनील यांच्यावर होती. दरम्यान ही घटना समजतात धोत्री येथील गोकुळ शुगरच्या अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालय येथे भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. नातेवाईकांनीही संबंधित कारखाना आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत सुनीलचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

