• Sat. Mar 14th, 2026
    रक्षाबंधनसाठी कुटुंब दुचाकीवरुन निघालं अन् घात झाला, आई-वडिलांनी पोटचं लेकरु गमावलं, जन्मदाताही गंभीर

    Gadchiroli News : रक्षबंधनादिवशीच त्रिकोणी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दुचाकीची ट्रॉलीसोबत भीषण धडक झाली आणि ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचे आई वडिल जखमी झाले आहेत. रक्षाबंधनादिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : रक्षाबंधनदिवशी गडचिरोलीतील एका कुटुंबासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भावाला राखी बांधण्यासाठी दुचाकीने निघालेल्या संपूर्ण कुटूंबावर काळाने घाला घातला आहे. आई वडिल आणि त्यांचा ८ वर्षीय मुलगा दुचाकीवरुन निघाले असता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक बसली. यामध्ये बालकाचा मृत्यू झाला आहे. तर आईवडील गंभीर जखमी झाले आहेत.

    शनिवार दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील अंकिसा मार्गावर ही घटना घडली. यात ८ वर्षीय शौर्य संतोष कोकू याचा नाहक बळी गेला आहे. वडील संतोष रामलू कोकू (वय ४३ वर्षे) व आई सौंदर्या कोकू (वय ३८ वर्षे) या जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेने रक्षाबंधनासारख्या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकू कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.
    चिमुकल्या आयुषचा चटका लावणारा अंत; मृत भावाच्या हातावर बहिणीनं बांधली अखेरची राखी; गाव हेलावला
    वृत्तानुसार, असरअल्ली येथील कोक्कू कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे राखी बांधण्यासाठी दुचाकीने सिरोंचाच्या दिशेने निघाले होते. मात्र अंकिसा गावाजवळ पोहोचताच रस्त्यावर निष्काळजीपणे उभी ठेवलेल्या रामकृष्ण चिरला यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची भीषण धडक बसली. अरुंद मार्ग, उभी केलेली ट्रॉली आणि वेळीच दिसून न आल्याने ही घटना घडली.

    धडकेचा जोर इतका भीषण होता की, यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष कोकू यांचे हात, पाय मोडले व गंभीर दुखापत झाली आहे. आई सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र संतोष कोकू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वरंगल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.

    रक्षाबंधनाच्या दिवशीच कोकू कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावरील अतिक्रमण व निष्काळजीपणे वाहने उभी केली जात असल्याचे अपघाताचे सत्र सुरु असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा वाहन मालकांवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील जनतेने केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा