Raju Shetti Slams PETA over Madhuri Report : माधुरी हत्तिणीला नांदणी मठात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महत्वपूर्ण बैठका सुर आहेत. मात्र PETA इंडियाने माधुरी आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. तिच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला आहे. यावर राजू शेट्टींनी आता संताप व्यक्त केला आहे.
पेटा इंडियाने असा दावा केला आहे की, गेल्या 33 वर्षांपासून महादेवी साखळदंडात, काँक्रीटवर, एकाकी अवस्थेत राहत होती, तिला ग्रेड-4 अर्थरायटिस, वेदनादायक फूट रॉट आणि मानसिक अस्वस्थतेची लक्षणं आहेत. त्यामुळे तिचे आरोग्य नांदणी मठात अधिक बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पेटाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात कुठेही महादेवीसाठी योग्य ठिकाण उपलब्ध नाही आहे. गुजरातमधील वनतारा हे केंद्रच तिच्यासाठी सर्वतोपरी अनुरूप आहे, कर्नाटकच्या किंवा उत्तर प्रदेशमधील इतर केंद्रांनाही पेटा पसंती देईल. फक्त तिथे तिच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा असाव्यात, असं पेटाने स्पष्ट केलं आहे. पेटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, त्या निर्णयातही महादेवीच्या आरोग्य व पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलंय. तसेच महादेवीला इतर हत्तींच्या सहवासात ठेवण्याचे निर्देशही आहेत, असं नमूद केलंय.
अखेर कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार
राजू शेट्टींचा पेटाच्या निवेदनावर संताप
मात्र महादेवीला परत आणण्यासाठी समर्थनाच्या लाट कोल्हापुरात उसळली आहे. त्यामुळे पेटाच्या निवेदनाला उत्तर देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेटावर जोरदार टीका केलीय. त्यांनी म्हटलं की, “पेटा ही संस्था हिंदू परंपरांवर आघात करत आहे. महाराष्ट्रात आम्ही आमच्या हत्तीची काळजी घेण्यास सक्षम आहोत. आमच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या महादेवीबाबत पेटाचा हस्तक्षेप अनावश्यक आहे. त्यांनी मंदिरांतील हत्ती बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतल्यासारखे वाटते. त्यामुळे पेटाने चोमडेपणा करण्याची गरज नाही.”राज्य सरकारकडूनही याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वनतारा, नांदणी मठ आणि सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी एक संयुक्त प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यात महादेवी हत्तीणीच्या आरोग्याची जबाबदारी सरकार घेईल, असा प्रस्ताव आहे.
दरम्यान, काही वन्यजीव तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी असा संकल्प मांडला आहे की, महाराष्ट्रात हत्तींना पुनर्वसन, उपचार आणि निवृत्त जीवन सुनिश्चित करणारे एक आधुनिक सुविधा केंद्र उभारायला हवे. यामुळे भविष्यात अशा वादांची पुनरावृत्ती टाळता येईल. महादेवीच्या प्रश्नावर सध्या सामाजिक, धार्मिक, न्यायिक आणि पर्यावरणीय अशा सर्व पातळ्यांवरून चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे तिच्या घरी परत येण्यासंबंधीचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.

