Parbhani Two Women Died While Morning Walk : परभणीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका भरधाव कारने दोन महिलांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परभणीतील दैठणा गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या दैठणा येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे आज गुरुवार रोजी सकाळी पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी परभणी गंगाखेड रस्त्याने पत्नीसह जात होते. त्यांच्यासोबत गावातील अन्य एक महिला होती. मॉर्निंग वॉक करत असताना उत्तमराव कच्छवे हे थोडे पुढे चालू लागले आणि या दोन महिला पाठीमागे बोलत बोलत मॉर्निंग वॉक करत होत्या. रस्त्याच्या कडेने लाईट नसल्याने अंधार होता. सकाळी साडेपाचच्या दरम्यान दैठणा गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील माळसोन्ना फाटा येथे उत्तमराव कच्छवे पोहोचले असताना एक भरधाव कार परभणीकडे जात असताना त्यांना दिसली आणि त्यासोबतच या कारने दोन्ही महिलांना पाठीमागून उडवल्याचं त्यांना दिसून आलं. अंधारामध्ये त्यांना स्पष्ट दिसलं नसलं तरी अपघात झाला हे मात्र त्यांना निश्चित कळालं.
Uddhav Thackeray : ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवतायत; उद्धव ठाकरे Trump Tariff बाबत सरकारवर संतापले, म्हणाले…
तात्काळ त्यांनी पाठीमागे धाव घेतली आणि पाहिले तर त्यांची पत्नी पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे (वय ६९) या रोडच्या खाली पडलेल्या दिसल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या अंजनाबाई शिसोदे (वय ५५) या रोडच्या मधोमध मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. दोन्ही महिलांची अवस्था पाहून उत्तमराव कच्छवे मात्र प्रचंड अस्वस्थ झाले. मॉर्निंग वॉकसाठी अन्य तरुण देखील याच रस्त्याने ये-जा करत होते. सर्वांनी मिळून या दोन्ही महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तसेच पोलिसांना देखील माहिती कळवली. दैठणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाय विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आज्ञत चारचाकी वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दैठना गावातील ज्येष्ठ दोन महिलांना मॉर्निंग वॉक करताना आपला जीव गमवावा लागल्याने परभणीसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे जाळे विणले आहे आणि त्यामुळेच या रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या देखील धावत आहेत. पण याच ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या कडेने सकाळी संध्याकाळी नागरिक फेरफटका मारत असतात. वेळोवेळी सांगूनही रस्त्याच्या कडेनं वॉकिंगला जाणं नागरिक टाळत नाहीत आणि त्यामुळेच असे अपघात होतात. दैठना गावातही रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या बऱ्याच नागरिकांना यापूर्वीही अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. वेळोवेळी सांगूनही नागरिक मात्र रस्त्याच्या कडेनेच मॉर्निंग वॉकसाठी जात आहेत. त्याचबरोबर लाईटची व्यवस्था देखील नसल्याने अंधारामध्ये ह्या अपघाताचे प्रमाण आणखीनच वाढलं आहे.

