• Sun. Aug 30th, 2026
नाशकात चारशेवर बालके कुपोषित; आदिवासी भागात स्थिती गंभीर, 3100 बालके मध्यम श्रेणीत

Malnutrition Cases In Nashik: जिल्ह्यातील कुपोषणाची तीव्रता आटोक्यात यावी , यासाठी राज्याच्या कुपोषण निर्मूलन व सांसर्गिक आजार नियंत्रण टास्क फोर्सने देखील जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करीत कुपोषण निर्मूलनार्थ सूचना केल्या आहेत.

malnutrition (फोटोमहाराष्ट्र टाइम्स)

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: कृषीसमृद्धीच्या जोरावर एकीकडे देश-विदेशात अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल साडेतीन हजार बालके कुपोषणाची शिकार बनल्याची बाब उघड झाली आहे. यापैकी तब्बल ४१० बालके तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत मोडत आहेत. विशेष म्हणजे आदिवासी तालुक्यांमध्ये अद्याप सुरू असणाऱ्या अंधश्रद्धेच्या प्रथाही यासाठी कारणीभूत असल्याचे अभ्यासक सांगतात. अनेक गावांमध्ये कुपोषितांची खरी आकडेवारी समोर येऊ नये, यासाठी स्थानिक यंत्रणादेखील कारणीभूत असल्याचे वास्तव आहे. यासाठी आता कुपोषणनिर्मूलन मोहिमेत सरपंचांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर सातत्याने उपाययोजना करण्यात येत असल्या तरी तळागाळात पोषणाबाबत अज्ञान, आरोग्याप्रति अनास्था, रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर, गरोदर मातांचा अपूर्ण आहार, अंधश्रद्धांचा ग्रामीण भागावरील पगडा आदी कारणांमुळे बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या २६ प्रकल्पांमधील ही आकडेवारी आहे.
Nashik News: जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा; कोव्हिड काळात सरकारची कोट्यवधींची फसवणूक, आरोग्य विभागात खळबळ
तीव्र कुपोषित (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) या दोन्ही गटांतील कुपोषित बालकांची संख्या जिल्ह्यात सुमारे ३५०० च्या घरात आहे. मुंबई-पुण्याशी कनेक्टिव्हिटी सांगणाऱ्या नाशिकसाठी ही आकडेवारी अंतर्मुख करणारी आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी आणि बागलाण या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये सर्वाधिक बालके कुपोषित आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी केंद्रे आणि आशा सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठ्यासह, बालकांची आरोग्य तपासणी, जनजागृती उपक्रम, औषध पुरवठा आदी उपक्रम सुरू आहेत.
‘राशप’चा नाशिकमधून एल्गार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढणार महामोर्चा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची घोषणा
कुपोषण निर्मूलन समितीचे लक्ष
राज्याच्या दुर्गम भागातील वाढत्या कुपोषणाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. कुपोषण निर्मूलनासाठी गत दोन वर्षांत राज्य शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आणि आदिवासी व दुर्गम भागात कुपोषण निर्मूलनासाठी कशाची गरज आहे, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाने शासनाकडे मागितला आहे.
Nashik News: चक्कर येऊन मैदानात कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू, लेकीला पाहून आईने हंबरडा फोडला
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेमध्येही कुपोषण निर्मूलन व सांसर्गिक आजार नियंत्रण टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी महिला व बालकल्याण विकास, आरोग्य विभाग व संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून या विषयातील आढावा घेत निर्देश दिले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.आणखी वाचा