Gadchiroli Accident Breaking News : गडचिरोलीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी व्यायाम करायला गेलेल्या सहा मुलांना एका भरधाव टिप्परने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सर्व मुले काटली (ता. गडचिरोली) येथील रहिवासी असून, सकाळी साडेचारच्या सुमारास साखरा गावाजवळील रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना त्यांना ही धडक बसली. टिप्पर गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जात होता. या अपघातात तन्वीर बालाजी मानकर (वय १६) आणि टिकू नामदेव भोयर (वय १५) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दूषण दुर्योधन मेश्राम (वय १४) आणि तुषार राजू मारबते (वय १४) या दोघांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्तांमध्ये क्षितिज तुळशीराम मेश्राम हा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर रेफर करण्यात आलं आहे. आदित्य धनंजय कोहपरे यासह आणखी एकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed News : ‘…म्हणून भाजप सोडून अजित पवारांसोबत जात आहोत, पंकजा मुंडेंनी मला…’; राजाभाऊ मुंडे मनातलं बोलले
अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. टिप्परचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी वाहन व चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
गडचिरोली तालुक्यातील गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सुरू केला आहे. मृत व जखमी मुलांच्या पालकांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे सकाळी १० वाजेपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी घटनास्थळी आले नसल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी याबबत ट्वीट केलं आहे.
Beed News : ‘…म्हणून भाजप सोडून अजित पवारांसोबत जात आहोत, पंकजा मुंडेंनी मला…’; राजाभाऊ मुंडे मनातलं बोलले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये (एक्स) काय म्हणाले?
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत २ युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या १ तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल.

