Raigad News : काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रायगडात आयोजित या कार्यक्रमात अजित पवार यांनी रायगडकरांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.
चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाचे स्वप्न
अजित पवार पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला, राजकारणाला सुसंस्कृत चेहरा त्यांनी दिला. ज्याची आज गरज आहे. शेवटी विकास झाला पाहीजे, नुसती भाषणे होऊन चालणार नाही. कृती दिसली पाहीजे, ती कृती करण्याचे काम महायुती सरकार करत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाचे स्वप्न घेऊन हे महायुतीचे सरकार काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती, धर्म, पंथ आणि भाषांना सोबत घेऊन पुढे जाईल. प्रत्येक माणसाला सुरक्षित वाटले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे.
पर्यटनाला चालना
ते पुढे म्हणाले, रेवस रेड्डीचे काम आम्ही मार्गी लावणार आहोत. पर्यटनाला चालना देत आहोत. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात ट्रीपल आयटी सेंटर सुरु करत आहोत. ज्यामुळे कौशल्य वर्धन करून तत्रंज्ञ तयार करण्याचे काम करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र विकसित करणार आहोत असेही ते म्हणाले.
Raj Thackeray: महाराष्ट्राला नख लावणाऱ्यांना अंगावर घेऊ; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
रायगडवर जास्त जबाबदारी
रायगडच्या पालकमंत्रीपदाबद्दल ते म्हणाले, “रायगडचा पालकमंत्री आम्ही तिघे ठरवणार.” याचा अर्थ मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवू. लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीला यश मिळाले. विरोधकांच्या आरोपांना जनता बळी पडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. रायगडवर जास्त जबाबदारी आहे, कारण प्रदेशाध्यक्ष याच जिल्ह्यातील आहेत. असे अजित पवार म्हणाले.
पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
अलिबाग-वडखळ रस्त्याचे काम रखडले आहे, हे यावेळी त्यांनी मान्य केले. जलवाहतूक आणि कोस्टल रोड तयार करण्यावर सरकार भर देत आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रवीण ठाकूर म्हणाले, रायगड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. “कोणी आमच्या नेत्यांवर वाईट बोलले, तर गाठ आमच्याशी आहे!” असा इशाराही त्यांनी दिला.

