मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यामुळे फुटले नसून तिथल्या अंतर्गत महत्त्वकांक्षामुळे ते पक्ष फुटले, असा दावा केला आहे.
“उद्धव ठाकरे हे कोणाच्याही लग्नाला गेले तर त्यांना वाटतं की तेच नवरदेव आहेत. त्यांना तेवढंच अटेन्शव हवं असतं. उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी कुणी फोडला? शरद पवारांनी फोडला. 1992 मध्ये जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तेव्हा सर्वात आधी शरद पवारांनी पक्ष फोडला. छगन भुजबळ यांच्यासोबत 13 लोक पक्ष सोडून गेले होते. आता त्याच शरद पवारांसोबत युती करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘दोन्ही पक्ष अंतर्गत महत्त्वकांक्षासाठी फुटले’
“त्यांचा पक्ष फुटला त्यावर ते आमच्यावर ब्लेम करु शकत नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे कट्टर बाळासाहेबांचे समर्थक होते. पण त्यांच्या लक्षात आलं की, आदित्य ठाकरे यांना नेता बनवण्यासाठी उद्धव ठाकरे आपले पंख छाटत आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं. तसेच शिंदे ज्या खात्याचे मंत्री होते त्याची बैठकदेखील आदित्य ठाकरे घेत होते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की, एकीकडे आपण विचारधारा सोडली आहे आणि दुसरीकडे आपले पंख छाटले जात आहेत. त्यांना लक्षात आलं की, आता आपण उठाव केला नाही तर आपण राजकारणात संपून जावू. त्यावेळी हे सर्वजण बाहेर आले. ही त्यांची महत्त्वकांक्षी आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केली. “तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालं. अनेक वर्ष अजित पवार हे शरद पवार यांचे उत्तराधिकारी आहे, असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये सुप्रिया सुळे यांना उत्तराधिकारी म्हणून पुढे केलं जातं. अजित पवारांना अनेक वेळा व्हिलन बनवलं गेलं. अजित पवारांना लक्षात आलं की, यापुढे राजकारण पुढे जाणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला हळूहळू अशाप्रकारे व्हिलन बनवलं जात आहे की, आपण पक्षात राहू शकत नाही. त्यावेळी ते बाहेर पडले. हे दोन्ही पक्ष अंतर्गत महत्त्वकांक्षासाठी फुटले”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘आमदारांची घुसमट होत होती’
“उद्धव ठाकरे यांचं आमदारांसोबतचं संभाषण संपलं होतं. उद्धव ठाकरे यांचे आमदार त्यांना भेटू देखील शकत नव्हते. ते अनेकदा त्यांच्या घराच्या गेटवरुन भेट न घेता परतत होते. यामध्ये अनेक जण हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वर्षानुवर्षे राहिलेले होते. उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे तृष्टीकरणाची नीती सुरु केली होती. काँग्रेससारखं करत होते. त्यामुळे आमदारांची घुसमट होत होती. ते विचार करत होते की, पुढच्या वेळी निवडणुकीला जनतेसमोर कसं जायचं? हीच घुसमट त्यांना आमच्यासोबत घेऊन आली. उद्धव ठाकरे वरच्या मजल्यावर राहत होते, ते जमिनीवरुन निघून गेले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘पक्ष फुटल्यानंतर आम्ही राजकीय संधी घेतली’
“उद्धव ठाकरे यांचे आमदार जेव्हा बाहेर पडले तेव्हा आम्हाला राजकीय संधी दिसली. ते बाहेर पडले तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत संपर्क केला. जे आम्ही करु शकत होतो ते आम्ही केलं. त्यांचा पक्ष फोडण्यासाठी आम्ही काहीच केलं नाही. पक्ष फुटल्यानंतर आम्ही राजकीय संधी घेतली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

