• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai News: आरेतील आदिवासींच्या अस्तित्वावर संक्रांत, वनहक्क नसल्याने २७ पाड्यांवर बेदखलीची टांगती तलवार

    Mumbai News: आरेतील आदिवासींच्या अस्तित्वावर संक्रांत, वनहक्क नसल्याने २७ पाड्यांवर बेदखलीची टांगती तलवार

    Aarey Colony: मुंबईच्या आरे कॉलनीतील २७ पाड्यांवरील आदिवासींच्या अस्तित्वावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य असूनही कागदपत्रांअभावी वनहक्क दावे दाखल करता आले नाही. त्यामुळे उपजीविकेचे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. तसेच, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि उच्च दाबाच्या वीजप्रवाहामुळे वृक्षतोड प्रस्तावित असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पिढ्यानपिढ्या मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये राहून अशिक्षित असल्याने कागदोपत्री पुरावे गोळा करणे, वनहक्क दाखल न करणे या प्रक्रिया न घडल्याने त्यांच्या राहत्या घरांवर आणि अस्तित्वावरच संक्रांत येण्याची शक्यता आहे. उपजीविकेचे मार्गही बंद होण्याची शक्यता असून, यासंदर्भात आदिवासी हक्क संवर्धन समिती आणि वनहक्क समिती पी. दक्षिण यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन आरेतील २७ पाड्यांसमोर जगण्याच्या समस्या मांडल्या.

    आरेतील नऊ जणांना सध्या फळझाडे लावण्याप्रकरणी अतिक्रमणाच्या नोटीस आल्या असून, ५ ऑगस्टपासून कारवाईचा इशारा देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दिनेश हबाळे यांनी दिली. ही झाडे वर्षानुवर्षे कसत असलेल्या शेतजमिनीचे रक्षण होण्यासाठी कुंपण म्हणून लावली असून ही झाडे कापल्याने फलोत्पादनाचे नुकसान होणार आहे तसेच शेतीचेही नुकसान होणार असल्याचे श्रमिक मुक्ती संघाचे लक्ष्मण दळवी यांनी सांगितले. या भागामध्ये रात्रीच्या वेळी म्हशी चरण्यासाठी सोडल्या जातात. आरेत बेबंदपणे चरणाऱ्या म्हशी स्थानिक आदिवासींच्या शेतीचे मोठे नुकसान करत असून याकडेही वारंवार तक्रारी करून लक्ष दिले जात नाही असे सांगण्यात आले.
    Mumbai Metro News: मेट्रो 3 ला मिळणार भुयारी पादचारी मार्ग! आरे JVLR ते कफ रोड प्रवास होणार अधिक सुलभ
    गोरेगाव- मुलुंड लिंक रोड, आरेमधून जाणारा उच्च दाबाचा वीजेचा प्रवाह यासाठी वृक्षतोड प्रस्तावित आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे दादासाहेब फाळके चित्रनगरीतील काही स्टुडिओही बाधित होणार असून या स्टुडिओंसाठी वर्षानुवर्षे कसल्या जाणाऱ्या जमिनींवर नवे बांधकाम सुरू झाल्याचे या आदिवासींनी सांगितले. चित्रनगरीमध्येही याविरोधात संघर्ष सुरू असून काही आदिवासींकडे १९३० च्या दशकापासूनचे सातबारे असून अस्तित्व संपू नये यासाठी किती काळ संघर्ष करत राहायचे असे यावेळी विचारण्यात आले.

    शायरीतून काँग्रेसवरील नाराजी उघड, कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाचं कारण सांगितलं

    गेल्या वर्षी पी. दक्षिण विभागाची वनहक्क समिती स्थापन झाली असून २७ पाड्यांमधील आदिवासींना वैयक्तिक तसेच सामूहिक वनहक्क दावे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे अपेक्षित असल्याचे सचिव आकाश भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे दावे करताना जातीच्या दाखल्यांची गरज भासते. हे जातीचे दाखले आजवर या आदिवासींना मिळालेले नाहीत. हे दाखले मिळण्यासाठी शिबिरे आयोजित व्हायला हवीत. एका शिबिरामध्ये ६७५ अर्ज आले मात्र केवळ १५० अर्ज स्वीकारले गेल्याचेही ते म्हणाले. प्रकल्पांची माहिती वनहक्क समितीसमोर येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.