Nagpur Healthy Streets: नागपूर शहरात सुरक्षित वाहतूक आणि रस्त्यांसाठी ‘हेल्दी स्ट्रीट्स’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणे, अभियंते व कंत्राटदारांना प्रशिक्षण देणे, तसेच पादचारी व वाहनचालकांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
हेल्दी स्ट्रीट्स उपक्रमाअंतर्गत बुधवारी वनामती येथे विशेष कार्यशाळा झाली. यात शहरात कशाप्रकारे रस्ते हवेत, यासंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मीना, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलिस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी आणि नागपूर महामेट्रोचे महेश मोरोणे उपस्थित होते.
Nagpur Crime : कारची काच फोडली अन् २५ लाखांची रोकड लंपास, भर दुपारी चोरट्याचा प्रताप; घटनेने खळबळ
मनपा आयुक्त म्हणाले, ‘शहरातील रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. रस्ते हे पादचाऱ्यांसाठी सुयोग्य, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त असायला हवेत. रस्त्यांवर दिशादर्शक फलक, सुटसुटीत फुटपाथ व सायकल ट्रॅक असायला हवेत. रस्त्यांचे नियोजन करताना नागरिकांच्या सोयीचा आणि आरोग्याचा विचार व्हायला हवा. वर्धा रोडवरील वॉकेबल स्ट्रीटवर नागरिक सायंकाळी चालताना किंवा सायकल चालवताना आनंद घेतात आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य ही चांगले राहते.’
डॉ. चौधरी यांनी अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची आणि गरज पडल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही दिली. येत्या काळात शहरात १५ ते २० किलोमीटर अंतराचे पादचाऱ्यांसाठी अनुकूल मार्ग तयार करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत त्यांनी भर दिला. तसेच कंत्राटदार आणि त्यांच्या कामगारांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, नागपूर शहरात दरवर्षी सरासरी ३४८ नागरिकांचा रस्ता अपघातांमध्ये मृत्यू होतो.
मात्र, यंदा योग्य पोलिसिंगमुळे आतापर्यंत ७० मृत्यू टळले आहेत. रस्ते सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यावेळी आयुक्तांनी रामगिरी मार्गाला ‘हेल्दी स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांमध्ये शिस्त आणि जनजागृती निर्माण करणे हेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Amol Mitakri | कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले तर नक्कीच राजीनामा देतील, मिटकरीं वक्तव्य
विद्यार्थ्यांना द्यावेत वाहतूकीचे धडे
नागपूर महानगर विकास प्रदेश प्राधिकरण आयुक्त संजय मीना यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्याची गरज व्यक्त केली. सध्या शहरात वाहने अत्यंत वेगाने चालवली जातात, त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करून वाहतुकीबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. अभियंते आणि कंत्राटदारांनाही प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी नमूद केले.
