• Mon. Mar 16th, 2026
    MGNREGA Scheme: मनरेगाच्या कामांचा धडाका; उद्दिष्टापेक्षा ७० टक्के अतिरिक्त कामे पूर्ण

    MGNREGA Scheme: केंद्राने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त ७० टक्के काम करण्यात आले आहे. ही कामगिरी पाहून केंद्राने शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६साठी राज्याला १३ कोटी मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आहे.

    मनरेगा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    अनुराग कांबळे,मुंबई : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांच्या (मनरेगा) कामाचा धडाका पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त ७० टक्के कामे राज्यात करण्यात आली आहेत. सन २०२४-२५मध्ये करण्यात आलेल्या एकूण ४.३६ लाख कामांपैकी अल्पभूधारकांसाठी सिंचनाची सर्वाधिक ३.९६ लाख कामे करण्यात आली. दरम्यान, सन २०२५-२६साठी प्रतिदिन ३१२ रुपये मजुरी देण्यात येत आहे.

    राज्यात मनरेगाच्या कामांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने साहजिकच योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने सन २०२४-२५मध्ये महाराष्ट्राला ९.५० कोटी मनुष्यदिवसाचे उद्दिष्ट मनरेगाच्या कामांमधून गाठण्याचे लक्ष्य दिले होते. परंतु, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने हे लक्ष्य पार करत एकूण १६.२२ कोटी मनुष्यदिवसांची निर्मिती केल्याचे दिसून आले.
    शहापूर हादरलं! आईला लेकी झाल्या नकोश्या, जेवायला दिलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?
    सन २०२४-२५मध्ये एकूण ४.३६ लाख कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ३.९६ लाख कामे ही अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पभूधारकांसाठी सिंचनाकरिता करण्यात आली. त्याखालोखाल दुष्काळ प्रतिबंधक (१९,७७५), ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते (७,५८३), जलसंधारण व जलसंवर्धन (४,६३०), तसेच ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत (३,४६४) कामे पूर्ण करण्यात आली. या वर्षात राज्यात जवळपास ८२ टक्के वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण करण्यात आली असून ही टक्केवारी देशातील कोणत्याही राज्याच्या टक्केवारीपेक्षाही अधिक आहे.
    Ganeshotsav 2025: एका खड्ड्यामागे 15 हजार दंडाचा निर्णय जाचक, गणेशोत्सव मंडळांची सरकार दरबारी धाव
    १.३० कोटी मजुरांच्या
    खात्यात थेट पैसे

    मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजुरांना त्यांची मजुरी थेट बँक खात्यात पाठविण्यात येते. त्यासाठी रोहयो विभागाकडून मार्च २०२५अखेरपर्यंत राज्यात १.३० कोटी मजुरांची बँक खाती उघडण्यात आली. यात सर्वाधिक खाती नाशिक जिल्ह्यात (६.८० लाख) त्याखालोखाल बीड (६.६५ लाख) आणि छत्रपती संभाजीनगर येथे (६.५२ लाख) खाती उघडण्यात आली. सर्वांत कमी खाती ठाणे जिल्ह्यात (१.४९ लाख) उघडण्यात आल्याचे दिसून आले. यापैकी ७३.४५ लाख खाती ‘आधार’शी संलग्नही करण्यात आली आहेत. त्यामुळे निधीवाटपात पूर्णपणे पारदर्शकता आली आहे.
    Mumbai News: मुंबईसाठी नवा ‘गोडे पाणी’ प्रकल्प; वर्सोवात निःक्षारीकरण प्रकल्पाची होणार उभारणी
    प्रतिदिन मजुरीचे दर (रुपयांत)
    २०२२-२३ —-२५६
    २०२३-२४ —-२७३
    २०२४-२५ —-२९७
    २०२५-२६ —-३१२

    मनुष्यदिवस म्हणजे काय ?
    एका दिवसात किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो, त्या संख्येनुसार मनुष्यदिवस मोजले जातात. उदा. एखाद्या गावात एका दिवसात १०० मजुरांना रोहयोचे काम मिळाले, तर त्या गावात १०० मनुष्यदिवस निर्माण झाले, असे म्हटले जाते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा