• Wed. Mar 11th, 2026

    तुम्ही हिंमत दाखवली! दुबेंना घेरणाऱ्या काँग्रेस खासदारांना राज ठाकरेंचं पत्र; ‘ती’ खंतही व्यक्त

    तुम्ही हिंमत दाखवली! दुबेंना घेरणाऱ्या काँग्रेस खासदारांना राज ठाकरेंचं पत्र; ‘ती’ खंतही व्यक्त

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना अभिनंदनपर पत्र लिहिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांवरून वर्षा गायकवाड यांनी त्यांना संसदेत जाब विचारला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचा अभिनंदनपर पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राविरोधात सातत्यानं वादग्रस्त विधानं करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी गेल्या आठवड्यात घेराव घातला. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मागील आठवड्यात काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी खासदार निशिकांत दुबे यांना गाठलं. त्यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल जाब विचारला.

    काँग्रेसच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. संसदेची लॉबी जय महाराष्ट्रच्या घोषणांनी दुमदुमली. त्याबद्दल राज यांनी खासदार वर्षा गायकवाड यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राकडे स्वत:चं काय आहे? महाराष्ट्र अन्य राज्यांच्या जीवावर जगतो, अशा आशयाची विधानं खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती.

    तुमचं मनपूर्वक अभिनंदन; राज ठाकरेंच्या पत्रात काय?
    राज ठाकरेंनी खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनंदनपर पत्र लिहिलं आहे. ‘मराठी माणसांना आपटून आपटून मारु, अशी दर्पोक्ति करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि जाब विचारलात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान होत असताना संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही कृतीनं छेद दिलात. याबद्दल तुमचे मनापासून आभार,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी गायकवाड यांचं कौतुक केलं आहे.

    ‘महाराष्ट्राला सध्या व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्रानं देशाचा विचार केला पाहिजे हे खरं आहे. कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्यं आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे, याचा विसर पडायला लागला आहे,’ अशी खंतही राज यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

    ‘सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या आणि १९५७ चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणे असूदेत. यात मरहट्टे होते. याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठीची माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे. तुम्ही ती ताकद दाखवलीत याबद्दल मनापासून आभार,’ अशा शब्दांत राज यांनी खासदार गायकवाड यांचं कौतुक केलं आहे.

    ‘महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसले माहीत नाही. पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यासमोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत,’ असंही राज यांनी पत्रात नमूद केलं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा