• Mon. Mar 9th, 2026
    जुन्या वादाने घात केला, एका रात्रीत दोघांचा जीव घेतला; नागपुरात खळबळ

    Nagpur Crime News : नागपूर शहरातील दोन भागांत धक्कादायक घटना घडल्या आहेत. हत्येच्या दोन घटनांमुळे शहर हादरले आहे. पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर : उपराजधानी नागपूर शहरात रविवारी रात्री अवघ्या काही तासांच्या अंतरावर दोन हत्या झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दोन भागांत घडलेल्या या दुहेरी खून प्रकरणामुळे नागपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेखाली आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नागपूर शहरात एका रात्रीत दोन हत्या होणे, ही चिंतेची बाब ठरू लागली आहे.

    पहिली घटना नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरातील गुजरी चौकात घडली. जुन्या वैमनस्यातून चार आरोपींनी हर्षल अनिल सौदागर (वय २४) या युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. आरोपी प्रज्वल कनारकर, प्रज्वल डोरले, वैभव हेडाऊ आणि राहुल शेटे हे चौघेही स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
    Kolhapur News : पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी, कोल्हापुरातील स्मशानात महिलेची अघोरी पूजा, तिघांची वाट लागू दे, कागदावर ‘लाल’ नावं
    वृत्तानुसार, हर्षल आणि मुख्य आरोपी प्रज्वल कनारकर यांच्यात काही दिवसांपूर्वी वाहन उचलण्यासंबंधी वाद झाला होता. मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र, त्यात दडपलेला राग रविवारी रात्री पुन्हा उफाळून आला. रात्री प्रज्वल कनारकर आणि त्याचे तीन मित्र गुजरी चौकात बसले असताना, हर्षल दुचाकीवर तिथे पोहोचला आणि चारही आरोपींना धडक देण्याचा प्रयत्न केला. यावरून वाद उफाळून निघाला आणि हर्षलने शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान प्रज्वल कनारकर घरात जाऊन चाकू घेऊन आला आणि हर्षलच्या गळ्यावर सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेतील हर्षलला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी काही तासांतच चौघांनाही अटक केली असून गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

    तर दुसरी हत्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॉटन मार्केट परिसरात घडली. अमोल नावाच्या युवकाचा त्याच्या मित्र सीतांबर मेश्राम याने दारू पित असताना झालेल्या वादात ढकलून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणातही तत्काळ अटक केली आहे.

    Nanded | पुन्हा हुंडाबळी, विष देऊन मुलीला मारलं, आई-वडिलांचा गंभीर आरोप

    पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल आणि सीतांबर हे दोघेही हमाल म्हणून काम करत असून जगनाडे चौकातील नंदनवन झोपडपट्टीत राहत होते. रविवारी रात्री कामावरून आल्यानंतर त्यांनी कॉटन मार्केटजवळील रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडीत दारू प्यायला सुरुवात केली. नशेच्या प्रभावाखाली त्यांच्यात वाद झाला आणि या वादात सीतांबरने अमोलला जोरात ढकलले. त्यामुळे अमोल जवळच असलेल्या मोठ्या दगडावर डोक्यावर पडला व गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील अमोलला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी सीतांबर मेश्रामला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा