• Sat. Mar 7th, 2026
    ठाकरे बंधू सोबत लढले तर..; सर्व्हेनं भाजपच्या गोटात खळबळ; MMRमध्ये आश्चर्यकारक निकालांची भीती

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट झाली. राज यांनी उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज तब्बल १३ वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले. उद्धव ठाकरेंचा काल ६५ वा वाढदिवस होता. या दोन नेत्यांच्या भेटीनं मनोमिलनाच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. ५ जुलैला मुंबईत विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आता राज यांनी उद्धव यांची थेट मातोश्रीवर जाऊन वाढदिवसानिमित्त भेट घेतल्यानं दोन बंधूंमधील दुरावा कमी झाल्याची चर्चा आहे.

    ठाकरे बंधूंच्या एकत्रित भेटीगाठी पाहता शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यता वाढल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात दिसू शकतो. मुंबई महानगर परिसरात (एमएमआर) शिवसेना उबाठा आणि मनसेची ताकद आहे. मनसेच्या स्थापनेमुळे शिवसेनेला या भागात फटका बसत आला आहे. पण आता दोन्ही पक्ष सोबत येण्याची शक्यता वाढल्यानं महायुतीची चिंता वाढली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं एमएमआर भागात सर्व्हेक्षण केलं आहे.

    उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्यास त्याचा मोठा परिणाम दिसेल, असं भाजपचा सर्व्हे सांगतो. भाजप जनमताचा कानोसा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी सर्वेक्षण करत आहे. त्यातील सर्वात ताज्या सर्व्हेनुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना तब्बल ५२ टक्के मतं मिळू शकतात. त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो. याचा अर्थ ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपचं अनेक वर्षांपासून स्वप्न अधुरं राहू शकतं.

    उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षांची युती न झाल्यास काय चित्र असेल, त्यांना किती मतं मिळू शकतील, याचाही अंदाज भाजपकडून घेण्यात आला. युती न झाल्यास एमएमआरमध्ये शिवसेना उबाठाला २४ टक्के, तर मनसेच्या १२.५० टक्के मतं मिळू शकतात. पण हेच दोन पक्ष सोबत आल्यास त्यांना मोठा जनाधार मिळू शकतो, असं भाजपचा सर्व्हे सांगतो. भाजपनं एका एजन्सीकडून हा सर्व्हे केलेला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनं भाजपची चिंता वाढली आहे.

    कौटुंबिक एकी की राजकीय युती? भावनिक गळाभेट की राजकीय समीकरणे?

    मुंबई महानगर परिसरात एकूण ९ महापालिका येतात. त्यामुळे हा भाग राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पनवेल महापालिकांचा समावेश होतो. या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेची युती झाल्यास त्यांना मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही बाब भाजपच्याच सर्वेक्षणातून समोर आलेली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा