• Sun. Mar 8th, 2026
    Mumbai Mantralaya: मंत्रालयात आता ऑफलाइन प्रवेश बंद; डिजिप्रवेश १ ऑगस्टपासून अनिवार्य

    Mumbai Mantralaya: येत्या एक ऑगस्टपासून मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली जाणार आहे.

    mantralaya (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : राज्य सरकारकडून मंत्रालयात प्रवेशासाठी जुन्या पद्धतीने दिला जाणारा ऑफलाइन प्रवेश यापुढे बंद करण्यात येणार आहे. येत्या एक ऑगस्टपासून मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली जाणार आहे. या संदर्भातील सूचना मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून, त्याशिवाय सर्व मंत्री कार्यालयांतही याबाबतची सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी शुक्रवारी दिली.

    राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील प्रवेशासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस रेकग्नायझेशन’ प्रणालीला सुरुवात केली होती. या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना प्रवेशासाठी नवी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आता मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही नवी ऑनलाइन प्रक्रिया या वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आली आहे. आता डिजिप्रवेश ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातूनच अभ्यंगताना प्रवेश दिला जाणार आहे. जुनी पद्धत पूर्णपणे मोडित काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. ही प्रक्रिया एक ऑगस्टपासून सक्तीची केली जाणार आहे.
    वादात सापडलेल्या मंत्र्यांना मिळणार डच्चू? विविध वादांमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा
    डिजिप्रवेश ही एक आधार क्रमांकांसोबत संलग्न केलेली ऑनलाइन प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मंत्रालयात ज्या विभागात भेट द्यायची आहे किंवा ज्या अधिकाऱ्यांच्या भेटण्याकरिता जायचे आहे, त्याबाबतची सर्व माहिती या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय ही ऑनलाइन प्रक्रिया राबविताना अभ्यागतांची चेहरा पडताळणीही पूर्ण केली जाणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून १० सेकंदांत चेहरा पडताळणी पूर्ण केली जाणार आहे. त्याशिवाय क्यू आर कोडही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रणालीमुळे अभ्यागतांना भेटीसाठी लागणारा वेळही वाचणार आहे.
    सर्पमित्रांना मिळणार सरकारी ओळखपत्र, १० लाखांचा अपघात विमा; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा
    विधान भवनातही सुरुवात?
    विधान भवनात काही दिवसांपूर्वीच आमदार समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. याचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता विधान भवनातही ‘फेस रिकग्नायझेशन’ प्रणाली सुरू केली जाण्याची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली. मंत्रालयाप्रमाणेच ही प्रक्रिया राबविण्यात येऊ शकते का, याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा