• Sun. Jun 7th, 2026

    महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, मंत्री संजय शिरसाट यांचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र

    महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, मंत्री संजय शिरसाट यांचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र

    Dispute in Mahayuti : महायुतीमधील धुसफूस काही कमी होताना दिसत नाही. कधी अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांमध्ये निधीवाटपावरुन नाराजी असते. तर कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून आपल्या निधी मिळत नसल्याचा आरोप महायुतीमधील आमदारांकडून केला जात असल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरु असतानाच आता महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची आणखी घटना समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे, असं वरवर भासवलं जात असलं तरी सारं काही आलबेल आहे, असं दिसत नाही. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी तर हेच दाखवून देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी काळात वादग्रस्त ठरलेल्या काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा असतानाच आता महायुतीमधील धुसफुसीची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पाठवलेल्या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

    विभागीय कामकाजांवरुन महायुतीमधील मंत्री आणि राज्यमंत्री आमनेसामने येताना दिसत आहेत. माधुरी मिसाळ यांनी बैठक घेतली. पण त्याची माहिती संजय शिरसाट यांना नव्हती. संबंधित बैठक झाल्यानंतर याबाबत संजय शिसरसाट यांना माहिती मिळाली. त्यानंतर संजय शिरसाट यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यापुढे बैठका घ्यायच्या असतील तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्या, अशा स्पष्ट शब्दांत संजय शिरसाटांनी राज्यमंत्र्यांना बजावलं आहे. संजय शिरसाट यांनी याआधीदेखील आपल्या खात्याचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी परस्पर वळवल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

    राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

    एकीकडे महायुतीत अनेक मुद्द्यांवरुन मतभेद असल्याची चर्चा असताना आता आगामी काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये आतापर्यंत जे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डच्चू देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना घरचा रस्ता धरावा लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा