Maharashtra Weather Update : राज्यभरात ब्रेक घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पावसाची ही स्थिती पुढील ४ दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे साताऱ्यातील काही भाग आणि विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या २५ जुलैला या भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
उर्वरित महाराष्ट्रातही मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागांत २६ जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस बसण्याची शक्यता आहे. यातच कोकणात पावसाची ही स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाने पुनरागमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे रायगडला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, माणागाव आणि इतर दमदार पाऊस झाला आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हवामान विभागने येत्या ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. रत्नागिरीलाही अतिवृ्ष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्येही दमदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील चार दिवस धोक्याचे असल्याचे सूचित केले आहे. २६ जुलैला समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार असल्याचीही शक्यता आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

