• Tue. Mar 10th, 2026
    Birhad Andolan: मंत्री भेटलेच नाहीत! मुंबईत चर्चेसाठी गेलेले बिऱ्हाड आंदोलक रित्या हाती परतले

    Birhad Andolan In Nashik: अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांची या विभागाच्या सचिवांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे बिऱ्हाड आंदोलकांचा ठिय्या कायम आहे

    birhad protest (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आदिवासी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह बाह्यस्रोत भरतीची प्रक्रिया रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलन बाबत आदिवासी विकास विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मुंबईत गेलेल्या आंदोलकांच्या प्रतिनिधींना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके न भेटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांची या विभागाच्या सचिवांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे बिऱ्हाड आंदोलकांचा ठिय्या कायम आहे.

    आदिवासी आश्रमशाळांत बाह्यस्त्रोतांद्वारे होणारी भरती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ व आमदार खोसकर यांनी आंदोलकांची भेट घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मंत्री झिरवाळ आणि उईके यांच्यातील चर्चेनुसार झिरवाळ यांच्यासोबत आंदोलक बुधवारी (दि.२३) मुंबईला गेले. ललित चौधरी, सुवर्णा वाघ, रमेश अहिरे, अमोल तायडे, प्रवीण पुंड, संतोष इंपाळ हे मुंबईत दाखल झाले. मात्र, त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हजर नसल्याने यासंदर्भात कुठलीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे उईके यांच्या बेफिकीरीवर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री झिरवाळ व आमदार खोसकर यांनी सचिव विजयकुमार वाघमारे यांच्याशी चर्चा केली. त्यातून काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
    Nashik Accident: खड्ड्यामुळे गेला तरुणाचा जीव; पडलेल्या दुचाकीस्वाराला कंटेनरने चिरडले, नाशिकमधील घटना
    मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
    आदिवासी विभागातील या भरतीविरोधात आदिवासी आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या. मंत्री झिरवाळ व आमदार खोसकर यांनी सचिव विजयकुमार वाघमारे यांच्याशी चर्चा केली. त्यातून काही तोडगा निघाला नसल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे आश्‍वासन झिरवाळ व खोसकर यांनी या आंदोलकांना दिले.
    Vijay Wadettiwar: बाबू धीरज रखो, सब ओपन होगा; ‘हनी ट्रॅप’प्रकरणावरुन वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशाराखोटरेंची प्रकृती खालावली
    बाह्यस्रोतासाठी विभाग ठेकेदाराच्या प्रेमात पडल्याने आदिवासी आंदोलकांची प्रकृती आता खालावत चालली आहे. शहरातील ईदगाह मैदानावर गेल्या १० दिवसांपासून तुळशीराम खोटरे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांना जागेवर उठून बसणेही अवघड होत आहे. बुधवारी त्यांचे डोळे अर्धेच उघडत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने त्यांनी वैद्यकीय उपचार सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा