• Sun. Jun 14th, 2026

    Mahayuti Government: पेच सुटला, सस्पेन्स संपला; 44-33-23चा फॉर्म्युला ठरला; महायुतीचा निर्णय झाला

    Mahayuti Government: पेच सुटला, सस्पेन्स संपला; 44-33-23चा फॉर्म्युला ठरला; महायुतीचा निर्णय झाला

    Mahayuti Government: राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदं आणि पालकमंत्रिपदांवरुन वाद झाले. यामुळे नाराज आमदारांना शांत करण्यासाठी महामंडळांचं वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर पालकमंत्रिपदांवरुन, मंत्रिपदांवरुन वाद झाले. भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी तिन्ही पक्ष ताकद वाढवत आहेत. विरोधकांची अवस्था दयनीय झालेली असल्यानं आता महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच स्पर्धा सुरु झाली आहे. तब्बल २३० आमदार सत्तेत असल्यानं अनेकांना इच्छा असूनही मंत्रि‍पदी संधी मिळालेली नाही. त्यामुळे सत्तेचे लाभ मिळत नसल्यानं आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीनं एक महत्त्वाचा फॉर्म्युला तयार केला आहे.

    विधानसभा निवडणुकीत भाजपनं १३२ जागांवर यश मिळवलं. तर शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्यानंतर सरकार स्थापन झालं. सत्तेतील आमदारांची संख्या खूप जास्त असल्यानं अनेकांच्या मंत्रि‍पदाच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. त्यामुळे तिन्ही पक्षांमधील नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. यातील काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. हीच नाराजी दूर करण्यासाठी महायुतीनं फॉर्म्युला तयार केला आहे.

    मंत्रि‍पदांनंतर महत्त्वाच्या असलेल्या महामंडळांच्या वाटपांसाठी महायुतीत सूत्र तयार केलं आहे. त्यानुसार महामंडळांचं वाटप केलं जाणार आहे. संख्याबळानुसार महामंडळांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुतीमधील भाजपच्या वाट्याला ४४, शिंदेंच्या शिवसेनेच्या ३३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला २३ महामंडळं येणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदं हुकलेल्या, विधानसभेला पराभूत झालेल्या, तिकीट कापण्यात आलेल्या किती जणांना महामंडळांवर संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

    राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी नेत्यांना बळ देणं गरजेचं असणार आहे. आजी-माजी आमदारांना महामंडळं देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते. महामंडळांच्या जबाबदाऱ्या देऊन या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. आता तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते महामंडळांवर कोणाकोणाची नियुक्ती करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा