• Sun. Jun 7th, 2026
    दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता, नातेवाईकांकडून शोध अन् नदीजवळ…;  घटनेनं रत्नागिरीत खळबळ

    रत्नागिरी जिल्ह्यातील बेपत्ता तरुणाचा शोध दोन दिवसांपासून घेतला जात आहे. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.अर्जुना नदीच्याकाठी असलेल्या पुलाजवळ हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला आहे मृतदेहाची ओळख पटली आहे.सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) असे या मृत तरुणाचं नाव आहे.

    राजापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण शनिवारी 19 जुलैपासून बेपत्ता होता. त्याचा शोध न लागल्याने त्याची बहीण (रा. जुगाई, येळवण) यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ या परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास हा मृतदेह मिळाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या या तरुणाचा शोध नातेवाईक घेत होते.

    राजापूर पोलिसांकडून यासंबंधी शोध सुरू होता,तपास सुरू होता याच दरम्यान हा मृतदेह मिळाला आहे. या तरुणाचा मृतदेह मिळाले ते समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा पंचनामा करून हा मृतदेह राय पठाण ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी शिवविच्छेदनाकरता करता देण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. हातावर बावा हे नावं कोरलं आहे अशी खूण दिसल्याने या मृतदेहाची ओळख पटली. रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदरीकर व त्यांच्या टीमने मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

    दरम्यान या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. शिवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे प्राथमिक कारण समजू शकणार आहे. हा अपघात, आत्महत्या की घातपात असा तपास राजापूर पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी कमलाकर पाटील करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा