• Sat. Mar 7th, 2026
    महादेव मुंडेंना आता न्याय मिळवून देणारच आणि माझ्यावर आलो तर…; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम

    Manoj Jarange Patil Meets Mahadev Munde Family : बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण खुन होऊन तब्बल १८ महिने उलटले आहेत. पण आरोपी अजूनही मोकाटच असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यातच त्यांच्या पत्नीने विष प्राशन केले होते. मनोज जरांगेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि भूमिका स्पष्ट केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    बीड : बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण खुन होऊन तब्बल १८ महिने उलटले आहेत. पण आरोपी अजूनही मोकाटच असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना या प्रकरणात दखल घालण्यासाठी आव्हान केले होते.

    मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या हाकेला प्रतिसाद देत आज मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या परळी येथील निवासस्थानी दाखल झाले आणि मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तर मुलांची विचारपूसही केली आहे. मयत महादेव मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत असल्याचे आश्वासनही जरांगेंनी दिले आहे.
    Beed News : बीडमध्ये चाललंय काय? वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याने व्हिडिओ बनवला अन् आमदारांवर केला आरोप
    महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठा झिजवत आहे. परंतु न केवळ आरोपी मोकाट आहेत, तर तपासातही तत्परता दाखवण्यात येत नाहीये. शेवटी हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि पोलिस अधीक्षक यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बातचीत करून त्यांनी अचानक विष प्राशन केले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता.

    दरम्यान, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील आव्हान केले होते. या अनुषंगाने आज मयत महादेव मुंडे यांच्या घरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आले आहेत. यावेळी त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी बातचीत केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे म्हणाले की, मी आता प्रशासन काय करणार हे पाहणार आहे. मला वाटले तर सबंध जिल्हा बंद करेन.

    जरांगे पाटलांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आश्वासन देत म्हटले की, मला सर्व खरी परिस्थिती समजली. येत्या २५ तारखेला परळी येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्री साहेब माझी आपल्याला विनंती आहे तत्काळ या प्रकरणात सीआयडी अन् एसआय ट गठित करा, अन्यथा मग मी माझ्यावर आलो तर बीड जिल्हा काय सबंध राज्य बंद करेल, असा इशाराही त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

    महादेव मुंडे यांच्या पत्नीने न्यायाची मागणी मनोज जरागे पाटील यांचेकडे केली यावेळी त्यांनी घटना क्रम सांगितला. माझ्या पतीला न्याय द्या, या मागणीसाठी तुम्ही माझ्या या लढाईत भाऊ म्हणून सोबत या अशी साद ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घातली होती. याला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील हे परळीतील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या निवास दाखल झाले. महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी कशा पद्धतीने आंदोलन उभं करणार हे देखील पाहणे आता तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा