• Tue. Mar 10th, 2026
    सरकारी अधिकाऱ्यांचा उदारपणा, गावकऱ्यांनीही दाखवला दिलदारपणा, नेमका मामला काय?

    Villagers Honored District Collector : शासकीय कामात विलंब होतो, असा अनुभव असताना या दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या कामामुळे नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. परंतु नंदुरबारचे हे दोन कर्तबगार अधिकारी या म्हणीला अपवाद ठरले आहेत.

    (फोटो– Lipi)

    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कात्री गावाने एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्यांनी केलेल्या वृक्षारोपणाला जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे नाव दिले आहे. याआधी नंदुरबारमध्ये ढगफुटीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नावाने पुनर्वसन गाव ओळखले जाते. शासकीय कामात विलंब होतो, असा अनुभव असताना या दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या कामामुळे नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” अशी म्हण प्रचलित आहे. परंतु नंदुरबारचे हे दोन कर्तबगार अधिकारी या म्हणीला अपवाद ठरले आहेत.

    दुर्गम भागातील समस्या तातडीने सोडवण्यावर भर

    सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने तो बोडका झाला आहे. त्यासोबत सातपुड्यातील दुर्गम भागात अनेक ठिकाणी रस्ते, विज यासह विविध समस्या आहेत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दुर्गम भागातील समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला आहे. त्यांनी धडगाव तालुक्यातील कात्री येथे भेट दिली. तिथे सामूहिक वृक्षारोपण, नदीचे जलपूजन, डिजिटल क्लासरूमची पाहणी केली. तसेच आरोग्य सेवांची तपासणी केली. सातपुड्यातील वृक्षतोड थांबवण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. कात्री गावाने 7000 रोपांचे वृक्षारोपण केले. या वनराईला डॉ. सेठी यांचे नाव देण्यात आले. खाट नदी बारमाही राहावी यासाठी त्यांनी जलपूजन केले. यावेळी त्यांनी वनराई बंधाऱ्यांचा अभ्यास करून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे आवाहन केले.
    Vasai News: वसईची स्वच्छतेकडे झेप! कचरा व्यवस्थापनेच्या निविदेला कंत्राटदारांची रांग, मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    गावकऱ्यांचे संसार उभे केले

    कोणत्याही गावाचे नाव बदलणे इतकं सोपे नाही. पण कात्रीच्या गावकऱ्यांनी चांगल्या कामाचा सन्मान म्हणून वनराईला जिल्हाधिकाऱ्यांचे नाव दिले. 2016 मध्ये नंदुरबारमधील पाचोराबारी गावात ढगफुटी झाली होती. रेल्वे रूळ आणि घरे वाहून गेली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मदत केली. त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने गावकऱ्यांची घरे पुन्हा बांधली. त्यांचे संसार उभे केले. म्हणून गावकऱ्यांनी पुनर्वसन झालेल्या गावाला त्यांचे नाव दिले.
    Vande Bharat Express : Good News! पुणेकरांच्या प्रवासाला आणखी गती मिळणार, चार नव्या वंदे भारत सुरु होणार; नियोजन कसे?
    सरकारी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ नागरिकांनी स्वतःहून घेतलेला हा पुढाकार अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाची पावती देतो.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा