Nagpur NEET Student Ends Life: नागपुरात एका विद्यार्थ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. अभ्यासाचा दबाव झेपत नसल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
16 वर्षीय एक विद्यार्थी नागपूरच्या कॅनॉल रोडवरील ‘फिजिक्सवाला विद्यापीठ’ कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होता. त्याचा पालकांनी बालाघाटहून नागपूरला वैद्यकीय प्रवेशासाठी (NEET) ची तयारी करण्यासाठी पाठवले होते. तो हिलटॉप परिसरातील हॉस्टेलवाला या वसतिगृहात राहत होता. सोमवारी या विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहातील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही हृदयद्रावक घटना विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक दबावाचे आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा उघड करत आहे.
मृत्यूपूर्वी या विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांसाठी एक सुसाईड नोट लिहिली होती. ती वाचताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. त्याने लिहिलं की, “ सॉरी मम्मी पापाजी, नाही करू शकणार मी… दीड आठवड्यापासून वाटत होतं की मी नाही करू शकणार… सॉरी… आणि धन्यवाद मला प्रत्येक गोष्ट वेळेवर दिल्याबद्दल… मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आई-बाबा… पण बस… आता नाही जमणार माझ्याकडून… बाय…” या चिठ्ठीत त्याने हेही लिहिले की, तो आई-बाबांना भेटायला खूप इच्छित होता. पण, आता शक्य नाही आणि त्यांना रडू नको असेही म्हटले. “मी हे सगळं स्वतःच्या इच्छेने करत आहे,” असे त्याने स्पष्ट केले होते. या शब्दांतून त्याच्या एकटेपणाचा, मानसिक थकव्याचा आणि निराशेचा प्रत्यय येतो.
MP News: मंत्री वडिलांचे पाय धरतात, माझं काहीही बिघडवू शकत नाही; BJP नेत्याच्या लेकाचं नाव लिहून विवाहितेने आयुष्य संपवलं
ही कहाणी या एकट्या विद्यार्थ्याची नाही, तर आजच्या काळात शिकणाऱ्या हजारो तरुणांच्या मनात चाललेल्या घुसमटीचं प्रतीक आहे. जीव देण्याच्या काहीच मिनिटांपूर्वी त्याने आपल्या मित्रांसोबत मेसमध्ये जेवण केले होते. कुणालाही कल्पना नव्हती की, तो जेवण केल्यानंतर असं काही करणार आहे. दुपारी 11 वाजता तो खोलीत गेला आणि आतून दार बंद केलं. बऱ्याच वेळापर्यंत त्याने दार उघडलं नाही, तेव्हा मित्रांनी दार तोडून आत प्रवेश केला. समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण वसतिगृह दुःखाने, सुस्काऱ्यांनी आणि रडण्याच्या आवाजाने हादरलं होतं.
अशी अनेक मुलं आज पालकांच्या स्वप्नांची, अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रचंड दबावात जगत आहेत. ही घटना प्रत्येक पालकासाठी एक मोठा इशारा आहे. आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य, त्यांचं भावनिक स्वास्थ्य आणि ते कितपत स्पर्धेला सामोरं जाऊ शकतात, यावर गांभीर्याने विचार करणं आता अत्यंत आवश्यक झालं आहे. प्रत्येक मुलाला स्पर्धेत उतरवणं गरजेचं नाही; त्यांच्या क्षमतांचा आणि मर्यादांचा सन्मान करणे हे पालकांचं आद्य कर्तव्य आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, शैक्षणिक यशाच्या शर्यतीपेक्षा मुलांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर हजारो ‘ख्वाहिश’ नावाच्या मुलांच्या मनात चाललेल्या त्रासाची हाक आहे. या हाकेला वेळेत ओ देणं, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

