• Fri. Mar 6th, 2026
    Raj Thackeray: थंड वातावरणात राजकारण तापणार? मनसेच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात

    Raj Thackeray In Igatpuri: राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे बंद दाराआड चर्चा करून युतीबाबतचे त्यांचे मत जाणून घेऊन पुढचे पाऊल टाकणार आहेत. त्यामुळे इगतपुरीतल्या थंड वातावरणात सुरू असलेल्या शिबिरातील निर्णयानंतर राज्यातील आगामी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: त्रिभाषा सूत्राच्या सक्तीच्या गरमागरमीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता थंड हवामान, रिमझिम पाऊस आणि गुप्त तटबंदीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील निवडक १२० शिलेदारांच्या तीनदिवशीय मंथन शिबिराला सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे बंद दाराआड चर्चा करून युतीबाबतचे त्यांचे मत जाणून घेऊन पुढचे पाऊल टाकणार आहेत. त्यामुळे इगतपुरीतल्या थंड वातावरणात सुरू असलेल्या शिबिरातील निर्णयानंतर राज्यातील आगामी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

    मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून युती करण्याबाबतचा दबाव वाढला आहे. त्यानंतर राज यांनी युतीबाबत कोणीही भाष्य करू नये असा सज्जड दम आपल्या पदाधिकाऱ्यांना भरला होता. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, याबाबत सस्पेन्स वाढला आहे. युती व्हावी अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा असली, तरी ठाकरेंच्या मनात काय, याबाबतचाही सस्पेन्स आहे. युती झालीच, तर आपल्याला कोणत्या जागा मिळतील, याबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युतीबाबत निर्णय घेतला जाणार असला तरी, त्यासाठी ठाकरेंनी आता पदाधिकाऱ्यांचे समोरासमोर मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    खोट्या प्रमाणपत्राद्वारे ‘प्रेस’मध्ये मिळवली नोकरी; 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा कारनामा उघड, नेमकं प्रकरण काय?
    मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर येथील १२० पदाधिकाऱ्यांना इगतपुरीच्या थंड वातावरणात पाचारण केले आहे. या शिबिरासाठी तटबंदी उभी करण्यात आली असून, आत कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. केवळ १२० पदाधिकारीच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्या वाहनचालकासह, सुरक्षारक्षकांनाही या शिबिरापासून लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या शिबिरात झालेला निर्णय राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार असल्याने या शिबिराकडे मराठी जनतेसह महायुतीचेही लक्ष लागून आहे.
    उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात; जुलैअखेर दोन दिवसीय दौरा, निवडणुकांचे रणशिंग फुंकणार
    नाशिकच्या कामांचे कौतुक
    नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना जे रस्ते झाले, त्याचे लोक आजही नाव घेतात. सध्याच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे, असे तुम्हीच सांगता. मागील कुंभमेळ्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार होती. त्यावेळी रस्ते खराब झाले तर त्याच खड्ड्यात घालेल, अशी तंबी दिल्यामुळे चांगली कामे होऊ शकली. नाशिकचा खत प्रकल्प आजही देशांमधील उत्तम घनकचरा प्रकल्प असल्याचा दावा ठाकरेंनी केला.

    २१ जुलैनंतर नाशिक दौरा
    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी व नियोजनासाठी ठाकरे यांनी २१ जुलैनंतर नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट केले. या शिबिरानंतर संघटना मजूबत करण्यासाठी नाशिकची निवड केली असून, त्यानंतर ठाकरे राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed