Khandala Ghat Accident: ट्रकचा अचानक ब्रेक लागल्याने ट्रकमधील पाइप धक्क्याने मागे घसरून ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी आणि कारवर पडले अन् भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
ऋतुजा चव्हाण (२६, रा. वारजे), अंकिता शिंदे (२८, रा. नेरे, मुळशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. वैभव गलांडे (२९), सोनाली खडेत्रे (३३), शिवराज खडेत्रे (६), लता शिंदे (५०, सर्व रा. वारजे), ललित शिंदे (३०, नेरे, मुळशी) अशी जखमींची नावे आहेत.
बोहल्यावर चढण्याआधीच काळाने साधला डाव; हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, डॉक्टर तरूणासोबत काय घडलं?
खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीहून खंडाळा (बोर) घाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने घाट चढत असताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाइप ट्रकमधून निसटले आणि ते मागून येत असलेल्या कार आणि दुचाकीवर पडले. या अपघातात दुचाकीवरील ऋतुजा चव्हाण यांचा मृत्यू झाला; तर मागे बसलेले वैभव गलांडे जखमी झाले. कारमध्ये बसलेल्या अंकिता शिंदे यांनाही जीव गमवावा लागला; तर कारमधील सोनाली, शिवराज, लता आणि ललित हे जखमी झाले.
पुण्यात दुसरे विमानतळ होणारच; पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार
अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक ठाकरे व हवालदार अमोल धायगुडे यांनी सहकाऱ्यांसह; तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग, ‘डेल्टा फोर्स’चे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून अपघातात पाइपखाली अडकलेल्या महिलांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी तत्काळ खोपोली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळित झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल धायगुडे करीत आहेत.

