Aaditya Thackeray on MNS-Shivsena UBT : मुंबईमध्ये पाच जुलैला ठाकरे बंधुंचा एकत्रित मराठी भाषा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल वीस वर्षांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक चित्र पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं अवघा महाराष्ट्र सुखावला. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होत आहे. आता युतीबाब आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे, दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी वातावरण आहे. यावर सविस्तर चर्चा होईल, पण हे सेंटिमेंट महाराष्ट्र हिताचं आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल.
‘जनसुरक्षा कायदा राजकीय हेतूने प्रेरित, तसा वास येतोय’, उद्धव ठाकरे यांचा दावा
आदित्य ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावरून सरकारवर टीकाही केली आहे. फडणवीसांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंनी ‘ते म्हणतात की डावी विचारसरणी? पण ज्या देशात ८० टक्के लोक रेशन वर राहतात, ते सरकार कोणत्या विचारसरणीचं आहे डावं की उजवं?’ असा खडा सवाल उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकाबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘ज्या योजना आपण काढतो त्या लेफ्टिंग आहेत, सध्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. भाजपचेच खासदार आहेत ते संविधान विरोधी आहेत. त्यांच्यावरही कारवाई करणार आहात का? आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या त्या कोणत्या कायद्यांतर्गत केल्या? जे अतिरेकी, नक्षलवादी असतील त्यांना सोडायचं नाही, पण या कायद्यात जनसुरक्षा हित नाही, ते जे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही विरोध करत आहोत. यामुळे मीडियाचे सुद्धा स्वातंत्र्य निघून गेले आहे,’ असे आदित्य म्हणाले.

