• Wed. Mar 11th, 2026
    चार दशकं जुनं हॉटेल अतिक्रमण हटवण्यात पाडलं; आठवणींचा एक कोपरा हरवला

    40 years old hotel demolished: छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली. रेल्वे स्टेशन ते महावीर चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. यात रेल्वे स्टेशन समोरील जुने हॉटेल जमीनदोस्त केले. अनेक दुकाने आणि बांधकामे पाडण्यात आली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे.

    म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अतिक्रमण हटावच्या कारवाईत महापालिकेच्या पथकाने रेल्वेस्टेशन समोरील चार दशकांचा साक्षीदार असलेले हॉटेल पाडले. बुधवारी रेल्वेस्टेशन ते महावीर चौक या रस्त्यावर पाडापाडी करण्यात आली. रस्त्यात बाधित होणारी विनापरवाना व अतिक्रमित बांधकामे पाडण्यात आली.

    महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना व अतिक्रमित बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात ही कारवाई करण्यात येत आहे. बीड बायपास रस्ता, जालना रोड (मुकुंदवाडी ते चिकलठाणा), पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रस्ता, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट आणि हर्सूल टी पॉइंट ते सिडको बसस्टँड या रस्त्यांवर पाडापाडीची कारवाई केल्यानंतर पालिकेने बुधवारी (नऊ जुलै) आपला मोर्चा रेल्वेस्टेशन ते महावीर चौक या रस्त्यावर वळवला. नवीन विकास योजनेनुसार या रस्त्याची रुंदी ३५ मीटर आहे. दुभाजकाच्या एका बाजूने साडेसतरा मीटर आणि दुसऱ्या बाजूने साडेसतरा मीटरनुसार मार्किंग करुन बाधित होणारी बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
    Jalna News :अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण; कागदपत्रे हरवली असताना जबाबदार कोण? लोढा यांचा प्रश्न
    या कारवाईची सुरुवात रेल्वे स्टेशन समोरील जनता हॉटेलपासून करण्यात आली. हे हॉटेल चार दशकांचे साक्षीदार होते. रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांपैकी अनेकजण या हॉटेलमध्ये चहापाणी करीत. परिसरातील नागरिकांच्या बसण्याउठण्याचे ते ठिकाण होते. रस्ता रुंदीकरणात पूर्ण हॉटेल बाधित झाले. त्यामुळे ते पाडण्यात आले. हॉटेल पडल्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील संपूर्ण परिसर मोकळा झाला आहे. या हॉटेलला लागूनच एक धार्मिक स्थळ आहे. धार्मिक स्थळाच्या दर्शनी भागात रस्त्याला लागून दहा ते पंधरा दुकाने होती. ही दुकानेदेखील पाडण्यात आली. आरटीओ ऑफिस समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. भरपावसात ही कारवाई सुरू होती.

    अतिक्रमण हटविण्याची कारवाई अयोध्यानगरीच्या मैदानाजवळ आली. या मैदानाच्या विरुद्ध दिशेला मुख्य रस्त्याला लागून काही बंगले आहेत. यापैकी बहुतेक बंगल्यांच्या संरक्षक भिंती रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहेत. हे सर्व बंगले बांधकाम परवानगी घेऊन बांधण्यात आलेले असल्यामुळे बाधित होणारा संरक्षक भिंतीचा भाग संबंधित मालमत्ताधारकांना स्वत:हून काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला. काही मालमत्ताधारकांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली नाही.

    कारवाई करीत पालिकेचे पथक पदमपुरा येथील हनुमान मंदिराच्याजवळ पोहोचले. या मंदिराच्या विरुद्ध बाजूला मुख्य रस्त्याला लागून नागरिकांनी आठ ते दहा दुकाने थाटली होती. ही दुकाने रस्त्यात बाधित होत असल्यामुळे जेसीबी मशिनच्या साह्याने ती पाडण्यात आली. माजी महापौर गजानन बारवाल या ठिकाणी आले. रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी बांधकामे नागरिक स्वत: काढून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्या भागातील बांधकामे पाडण्यात येत आहेत तो भाग गावठाणचा आहे असे त्यांनी नमूद केले.

    संदीपान भुमरेंच्या भावजयीसाठी वायूवेगाने मद्य परवाना स्थलांतरित, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

    पंचवटी चौकापर्यंत पालिकेच्या पथकांनी अशा प्रकारची कारवाई केली. पदमपुरा ते पंचवटी चौक या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली विनापरवाना व अतिक्रमित बांधकामे पाडली. यामुळे रेल्वे स्टेशन ते महावीर चौक या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होत आहे. कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्याशिवाय पालिकेच्या नागरी मित्रपथकाचे जवान, अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.