• Tue. Jun 16th, 2026
    Vidarbha Flood: विदर्भात पूरस्थिती, मध्यप्रदेशशी संपर्क तुटला, गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले

    Vidarbha Heavy Rain Update: गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाल नदीचा पूल पाण्याखाली आल्याने नागपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक थांबली. यासोबतच अंतर्गत रस्त्यांवरील नदी, नाल्यांचे पूल पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. धोका टाळण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली.

    विदर्भात पूरस्थिती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नागपूर: विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बावनथडी नदीच्या पुरामुळे मंगळवारी महाराष्ट्राचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला.

    मागील २४ तासांत भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वैनगंगा आणि बावनथडी नदीला पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे बावनथडी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने महाराष्ट्र-मध्य प्रदेशचा संपर्क तुटला आहे. सकाळपासून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यासोबतच वैनगंगा नदीच्या पुरामुळे १८ मार्गांवरील वाहतूक थांबली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने २४५.५० मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे लहान पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यासोबतच सर्व सातही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यातील सिहोरा मंडळात २३१.५० मिमी इतका झाला आहे.

    गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने केशोरी, नवेगावबांध, देवरी, चिचगड, अर्जुनी-मोरगाव, आमगाव हद्दीतील अनेक रस्ते बंद पडले आहेत. जिल्ह्यात सरासरी ११०.६ मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवराचे दोन गेट तीन फूट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कवलेवाडा येथील पुष्पा पटले यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.

    ब्रह्मपुरी, नागभीडमध्ये धुवांधार

    चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात मागील २४ तासांत धुव्वाधार पाऊस झाला. मागील २४ तासांत ब्रह्मपुरी तालुक्यात १६२.८ मिमी तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही अंतर्गत रस्ते बंद झाले असून दोन्ही तालुक्यातील सुमारे २० घरांचे अंशतः नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पहिलाच मुसळधार पाऊस असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली नाही. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने नागभीड तालुक्यातील डोंगरगाव-नागभीड मार्ग बंद झाला आहे. या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा