• Fri. Mar 6th, 2026

    मराठा समाजाने ओबीसी म्हणून नोंद केल्यास…; जातनिहाय जनगणनेसंबंधी समीर भुजबळांनी दिला इशारा

    मराठा समाजाने ओबीसी म्हणून नोंद केल्यास…; जातनिहाय जनगणनेसंबंधी समीर भुजबळांनी दिला इशारा

    जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने ओबीसी नोंद केली तर त्यासंबंधी इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिला आहे. चुकीच्या नोंदी झाल्यास ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असा दावाही त्यांनी केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने ओबीसी म्हणून नोंद केल्यास त्याचा विरोध करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे नजिकच्या काळात नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.जातनिहाय जनगणनेबाबत समता परिषदेच्या माध्यमातून जनजागृती आणि परिषदेचा विस्तार करण्यासाठी भुजबळ यांनी दोन दिवसांचा विदर्भ दौरा केला. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जिल्हानिहाय संवाद साधला. जनगणनेबाबत सजग राहण्याची सूचना केली. यावेळी बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे, दिवाकर गमे आदी उपस्थित होते.

    शिक्षेची तरतूद अन् कारवाई
    बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना समीर भुजबळ म्हणाले, ‘मराठा समाजातील नागरिकांनी ओबीसी म्हणून नोंद केली तरी, त्यांना पुरावा द्यावा लागेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेचा मराठा समाजाला लाभ मिळत आहे. जातनिहाय जनगणनेत चुकीची माहिती देणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असल्याने कारवाई होऊ शकते.’जनगणनेत चुकीच्या नोंदी ग्राह्य धरल्यास ओबीसींची लोकसंख्या वाढेल. तीनशे पन्नास जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. यात विमुक्त भटक्यांचा समावेश झाल्याने ओबीसींना प्रत्यक्षात १९ टक्केच लाभ मिळेल. चुकीच्या नोंदींची माहिती दिसून आल्यास जनगणनेवर आक्षेप घेण्यात येतील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

    ‘तो’ आरोप समीर भुजबळांनी फेटाळला
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर गावोगावी जनजागृतीचे परिषदेमार्फत काम केले जाणार आहे. गणना यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज करण्यात येत आहे. समता परिषदेने ओबीसींच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने केली. विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. खासदार असताना दोन हजार नऊ साली जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटून धरला. यानंतर जातनिहाय गणना झाली पण, सत्ता बदलल्यानंतर अनेक त्रुटी असल्याचे कारण समोर करून ती जाहीर केली नाही, याकडेही समीर भुजबळ यांनी लक्ष वेधले. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी समता परिषद दबावाचे राजकारण करते, हा आरोप समीर भुजबळ यांनी फेटाळून लावला.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा