Newly Married Couple Ends Life: सोलापुरात एका नव दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे.
गोपाळ लक्ष्मण गुंड (वय वर्ष 30), गायत्री गोपाळ गुंड (वय वर्ष 22 दोघेही राहणार उळे गाव , तालुका उत्तर सोलापूर) या नव दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस घडकीस आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सोमवारी (7 जुलै) सकाळ पासून उळे गावात स्मशानशांतता आहे. दोन महिन्यांअगोदर प्रेम विवाह केलेल्या गोपाळ आणि गायत्रीने जीव का दिला हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांचा कसून तपास सुरू
गोपाळ गुंड आणि गायत्री गुंड या नव दाम्पत्याचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे. उळे गावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली. गायत्रीचा मृतदेह खाली फरशीवर निपचित पडला होता. तर गोपाळ गुंड हा तीस वर्षीय तरुण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. प्रेमविवाह केलेल्या या दोघा नव दाम्पत्याने टोकाचा पाऊल का उचलले याचा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी कसून तपास करत आहेत.
या दोघांनी का उचलले टोकाचे पाऊल?
प्राथमिक माहितीनुसार गोपाळ गुंड याने आपल्या पत्नीचा चार्जरच्या वायरले गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आयुष्याची अखेर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. या नव दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत नेमकं कारण समोर आले नाही. रात्री दोन ते तीन च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत सदर घटनेची नोंद झाली आहे.

